गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. नवे कायदे रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात असून, विविध संघटनांकडून मागणी केली जात आहे. कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून सरकारवर होत असलेल्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले आहे. पंतप्रधानांनी कृषी मंत्र्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा हवाला देत विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
“अध्यक्ष महोदय, अनेक आव्हानं आहेत. पण, समस्येचा भाग व्हायचं की, समाधानाचा? हे आपल्याला ठरवावं लागेल. छोटी रेषा आहे. जर समस्येचा भाग बनलो तर राजकारण होईल. समाधानाचा भाग झालो तर राष्ट्राच्या धोरणाला चार चाँद लागतील. वर्तमान पिढीबरोबरच नव्या पिढीचाही विचार करणं, हे आपलं दायित्व आहे. समस्या आहेत, पण सोबत काम केलं तर निश्चित यश मिळवू,” असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेमध्ये बोलताना शीख समाजाचे कौतुक केले. “शिखांनी जे योगदान दिले, त्याचा भारताला अभिमान आहे. शीख समाजाने देशासाठी भरपूर काही केलं आहे” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. गुरु साहिब यांचे शब्द आणि आशिर्वाद आमच्यासाठी अनमोल आहेत, असे मोदींनी सांगितले.