नवी दिल्ली : केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या १०० दिवसांपासून केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. त्यात प्रजासत्ताक दिनी झालेल्या घटनेनंतर संपूर्ण जगभराचे लक्ष या आंदोलकांनी आपल्याकडे खेचून घेतले आहे.
मात्र आताकेंद्राने केलेले कायदे किती शेतकऱ्यांच्या मान्य की अमान्य हे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. केंद्राने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना राज्यातील सुमारे ८२.२ टक्के शेतकऱ्यांचा विरोध असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून समोर आला आहे.
‘किसान आझादी आंदोलन’ या संघटनेच्या वतीने कृषी कायदे आणि किमान हमीभाव या विषयांवर १६ जानेवारीपासून शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची या कायदेसंदर्भात काय मते आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्य़ांतून १६१४ शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदविला.
या सर्वेक्षणात सुमारे ८९.३ टक्के शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांबद्दल जागृत असल्याचे मत व्यक्त केले. कृषी कायदे शेतकरी हिताचे आहेत का? या प्रश्नावर ८२.२ टक्के शेतकऱ्यांनी कृषी कायदे शेतकरी हिताचे नाही असे उत्तर दिले आहे.