काँग्रेसगुजरात विधानसभा निवडणुकी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून सक्रिय होऊ लागली आहे. रविवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे ट्विटमध्ये गुजरात निवडणुकीसंदर्भात काँग्रेसची आठ आश्वासने शेअर केली. यासोबतच त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या डबल इंजिनच्या फसवणुकीपासून काँग्रेस लोकांना वाचवेल असंही म्हटलं आहे.
गुजरात निवडणुकीसंदर्भात राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये अनेक आश्वासने दिली आहेत. “500 रुपयांत एलपीजी सिलिंडर, तरुणांना 10 लाख नोकऱ्या, 3 लाखांपर्यंतचे शेतकरी कर्जमाफी – काँग्रेसने गुजरातच्या जनतेला दिलेली सर्व 8 आश्वासने आम्ही पूर्ण करू. भाजपाच्या ‘डबल इंजिन’च्या फसवणुकीतून तुम्हाला वाचवू, राज्यात परिवर्तनाचा उत्सव साजरा करा” असं म्हटलं आहे.
काँग्रेसच्या आठ आश्वासनांमध्ये महिला, शिक्षण, तरुण, कोरोनाग्रस्त, आरोग्य, शेतकरी आणि गुजरातची सुरक्षा याबाबत आश्वासने देण्यात आली आहेत. काँग्रेसची सत्ता आल्यास महिलांना 500 रुपयात गॅस सिलिंडर आणि 300 युनिट वीज मोफत मिळणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याचे सांगण्यात आले आहे.
काँग्रेसच्या आठ आश्वासनांसह गुजरात 1 आणि 5 डिसेंबरला परिवर्तनाचा उत्सव साजरा करेल, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. या आश्वासनांमध्ये मुलींना केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण, इंग्रजी माध्यमाच्या 3000 नवीन शाळा सुरू केल्या जातील. त्याचबरोबर 10 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या, कंत्राटीऐवजी कायमस्वरूपी नोकऱ्या आणि बेरोजगारांना 3000 रुपये भत्ता दिला जाणार आहे.