मुंबई | काही दिवसांपासून राज्यातील राजकीय समीकरणं बदलणार असल्याचं पहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी हिंदूत्वाची भूमिका मांडत भाजप सोबत युतीचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे वंचित बहुजन पक्षाने शिवसेनेसोबत युतीचे संकेत दिले आहेत. अशातच आता वंचित बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
मनसे हा महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही, मुंबईमधील सर्व वॉर्डांमध्ये तरी त्यांच अस्तित्व आहे का नाही हे पण माहिती नाही, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मनसेला टोला लगावला आहे. भाजप आणि मनसेच्या भूमिकेबाबत राज्य सरकारला शंका आहे. राज्यात काही तरी घडण्याची शक्यता असून ३ मे ला काही तरी घडणार असं वाटतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा होणार असल्याचं पहायला मिळतं आहे.
आम्ही १ मे ला शांती मार्च राज्यात काढणार आहे. या मार्चमध्ये ज्या संघटना सहभागी होतील त्यांचं आम्ही स्वागत करतो, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. परंतू राजकीय पक्षांचं आम्ही स्वागत करणार नाही, असंही ते म्हणाले आहेत. भोंग्याच्या संबंधात सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. तो निर्णय केंद्राला आणि राज्याला लागू असतो. त्यामुळे विरोधी पक्षांच्या बैठकीत नवीन धोरण ठरविण्यावरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे कान टोचले आहेत.