25 खासदार, 115 आमदार अन् स्वबळावर सेनेचा मुख्यमंत्री, संजय राऊतांच बुलढाण्यात मोठं विधान

 

आपल्या डोक्यावर बेकायदेशीर सरकार बसवलं आहे. हे सरकार लवकरच जाणार असल्याचा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. 110 दिवस मी तुरुंगात होतो. जाताना माझ्या हातात भगवा होता. हा भगवा शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत राहणार असल्याचे राऊत म्हणाले. लोकसभा असतील किंवा विधानसभा निवडणुका असतील शिवसेनेचे 25 खासदार आणि 115 आमदार आपण निवडून द्यायला हवेत. शिवसेनेचा स्वबळावर मुख्यमंत्री निर्माण करुन या रेड्यांचा राजकीय बळी घेतला पाहिजे तरच आपण शिवसैनिक अशी डरकाळी राऊतांनी फोडली.

शनिवारी बुलढाण्यात शिवसेनेच्या वतीन शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जहरी टीका केली. लवकरच राज्यातील सरकार जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बुलढाण्याच्या पवित्र भूमित गद्दारीची बीज रोवली आहेत. ती आपल्याला कायमची उखडून फेकण्यासाठी या मशाली पेटल्या आहेत, असं म्हणत राऊतांनी शिंदे गटाच्या आमदारांचा समाचार घेतला. बुलढाण्यात किती खोके आले? सगळ्यात जास्त खोके बुलढाण्यात आले. एक फूल दोन हाफ. एक खासदार आणि दोन आमदार असे म्हणत राऊतांनी शिंदे गटात गेलेल्या आमदार आणि खासदारांवर टीका केली.

सगळ्यात मोठी देवता या बुलढाणा जिल्ह्यात आहे ती म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ. रेणुका मातेचं मंदीर इथे आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी आहे. असे असताना 40 रेडे गुवाहाटीच्या देवीला नवस बोलायला गेले आहेत. महाराष्ट्रातील देव संपले का? असा सवाल राऊतांनी केला. हा महाराष्ट्र संताचा आहे. ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद बोलवून घेतले आणि मुख्यमंत्री 40 रेड्यांचे बळी द्यायला गुवाहाटीला गेल्याचे राऊत म्हणाले.

 

 

Team Global News Marathi: