गणेश भोळे
उस्मानाबाद – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अंतर्गत जिल्ह्यात मतदान 18 एप्रिल रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन निवडणूक प्रक्रियेसाठी… उमेदवार लढतीसाठी तर जनता मतदानासाठी सज्ज झाली आहे.
या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात मतदानाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करुन मतदानाचे प्रमाण वाढावे, याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विविध माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. देशाच्या विकासाला दिशा देण्यासाठी आपण मतदान करणे, हे प्रत्येक मतदाराने लक्षात घेऊन जाणीवपूर्वक मतदान केले पाहिजे, यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, महिला, खेळाडू, कलाकार, शिक्षक, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थीनी, तृतीयपंथी, जेष्ठ नागरीक, दिव्यांग, माजी सैनिक अशा सर्वांच्या सक्रिय आणि उत्स्फूर्त सहभागाने विविध प्रकारे संपूर्ण जिल्हयात मतदार जागृती अभियान मोठया प्रमाणावर राबविण्यात आले. आता प्रतिक्षा आहे ती प्रत्यक्ष मतदान मोठया संख्येने होण्याची.
निवडणूक प्रक्रियेतील मतदारांचा सक्रिय सहभाग, यशस्वी व सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचे असल्याने 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी येत्या 18 एप्रिल रोजी मतदान निश्चित करावे, असे आवाहन सर्व जनतेला, मतदारांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक आर.राजा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचा-यांनी, समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांनी केले आहे.