१६ ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात, शिंदे गट विरुद्ध शिवसेनेचा सामना

 

औरंगाबाद | एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर राज्यातील सर्वच ठिकाणची राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. औरंगाबादमधी 16 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. विशेषतः बजाजनगरसारख्या ग्रामपंचायतीचाही यात समावेश आहे. आज सकाळपासूनच ग्रामपंचायत सदस्यांनी मतदानाला सुरुवात केली आहे.

आज सकाळी साडे सात वाजेपासून विविध ठिकाणच्या मतदारांनी आपला हक्क बजावला. शिंदे गटात गेलेल्या आमदारांचा प्रभाव असलेल्या वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीत उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जिल्ह्यातील या ग्रामपंचायत निवडणुकांतील निकाल काय लागतो, हे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं ठरणार आहे.

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांट यांच्या वर्चस्वाखाली येणाऱ्या बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आज मतदान होत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष येथील निवडणुकांकडे लागलं आहे. शिंदे गटात जाण्यासाठी इतर आमदारांचं मन वळवण्याकरिता आमदार संजय शिरसाट यांची मोठी भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्यांच्याच मतदारसंघातील ग्रामपंचायतींमध्ये अनेक कार्यकर्ते आणि शिवसैनिकदेखील शिंदे गटाकडे वळाले असण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दृष्टीने ही प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबादेतल्या प्रत्येक निवडणुकीवर उद्धव ठाकरेंचं बारकाईनं लक्ष असणार आहे. संजय शिरसाट यांच्या विधानसभा मतदारसंघातील मोठी आणि औद्योगिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाची असलेल्या वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीसाठी आज निवडणूक होत आहे. मागील वेळी येथे 17 पैकी 16 सदस्य शिरसाट यांच्या पॅनलचे होते.

Team Global News Marathi: