दिल्लीत कोरोना महामारीची तिसरी लाट आल्याने राज्यातील नागरिकांना पुन्हा या भीषण रोगाला तोंड द्यावे लागत आहे. प्रदूषणामुळेच राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्यातील अरविंद केजरीवाल सरकारने दिल्लीत पुन्हा मिनी लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत.
कोरोनाला पुन्हा नियंत्रणात आणण्यासाठी गर्दीचे बाजार बंद ठेवणे, धार्मिक आणि घरगुती कार्यक्रमांसाठी फक्त 50 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असे उपाय राबवण्याचे केजरीवाल सरकारने ठरवले आहे. तशी शिफारस केंद्राकडे केली आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. केजरीवाल म्हणाले, दसरा आणि दिवाळीच्या काळात दिल्लीकर आता कोरोना संपला अशा भरात वावरत आहेत. हे रोखायचे तर आम्हाला बाजार बंद, सार्वजनिक कार्यक्रमांवर प्रतिबंध आणि मास्क न वापरणाऱयांना कठोर शिक्षा असे प्रतिबंधात्मक उपाय राबवावेत लागणार आहेत.
त्यासाठी राज्यात पुन्हा मिनी लॉकडाऊनसाठी आम्ही केंद्राकडे परवानगी मागितली आहे, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. लग्न समारंभात 200 ऐवजी फक्त 50 पाहुण्यांनाच कोरोना प्रतिबंधक उपाय राबवून बोलावण्याची परवानगी आणि मास्क न वापरणाऱयांना मोठा दंड करणे असे उपाय राबवण्याचे ठरवले आहे.