मुंबई मनपाचा गड जिंकण्यासाठी भाजपच्या रणनीतीला सुरुवात
शिवसेनेचा सर्वात मोठा गड समजला जाणारा अर्थात ‘बृहमुंबई महानगर पालिका’ हा गड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून खेचून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ‘मिशन मुंबई’ची आखणी केली आहे. बिहारच्या सत्तेत कमळ फुलवल्यानंतर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमने बृहमुंबई मनपाची सत्ता खेचून आणण्यासाठी आखणी करायला सुरवात केली आहे.
याच संदर्भात आज सायंकाळी दादर येथील वसंत स्मुर्ती येथील भाजपा कार्यालयात मुंबई भाजपा कार्यकारणीची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार हे उपस्थित राहणार आहे. या बैठीकीत नेमकी कोणती रणनीती ठरवली जाणार आहे याकडे शिवसेनेचे लक्ष लागले आहे.
नेमकं मिशन मुंबई आहे काय ?
बिहार विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली बिहारमध्ये भाजपने घवघवीत यश मिळविले आहे. या यशानंतर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मुंबई मनपाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे येणारी मुंबई मनपा निवडणूक शिवसेनेला जड जाणार हेच दिसून येते. यामुळे आज होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.