विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा दिवस सुशंतासिंह राजपूत, दिशा सालियन व रिया चक्रवती प्रकरणावरुन तापलाय. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत आमदार आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
यावर आदित्य ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना सत्ता पक्षावर जोरदार टीका केली. ज्या महाराष्ट्रद्वेषी राज्यपाल यांनी महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला, त्यांना व घोटाळेबाज, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचविण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. एका ३२ वर्षाच्या तरुणाने या खोके सरकारला हलवून ठेवले आहे, असा खोचक टोलाही त्यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.
विधिमंडळ अधिवेशनाचा आज ४ था दिवस एयु.. एयु कौन है? च्या मु्द्दयाने गाजतोय. सत्ताधाऱ्यांच्या टार्गेटवर आदित्य ठाकरे असून या प्रकरणाची आता एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर सभागृहातील वर्तनावर आक्षेप नोंदवित टीका केली. ते म्हणाले, लक्ष विचलित करण्याचा सत्ताधाऱ्यांचा हा प्रयत्न आहे. जे काही शोधायचे आहे ते शोधू द्या.. महत्वाची गोष्ट म्हणजे एनआयटीचा जो घोटाळा आहे तो आम्हाला सभागृहात मांडू न देण्याचा हा प्रयत्न आहे, असे ठाकरे म्हणाले.