आपण स्वतःहून बंधने पाळू तितक्या लवकर या संकटातून बाहेर पडू. म्हणून जनतेने स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, अनावश्यक प्रवास टाळा, कोरोनाचे संकट राज्यात वाढण्याआधीच या संकटाला परतवून लावूया, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सर्व जिल्हाधिकाऱयांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
जगभरातील देशांमध्ये पहिल्या दोन आठवडय़ांत या आजाराचा प्रादुर्भाव जाणवलेला नाही. मात्र तिसऱया-चौथ्या आठवडय़ात तो मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. आपल्या राज्यासाठी कोरोनाचा तिसरा-चौथा आठवडा सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार सज्ज आहेच. परंतु राज्यातील जनतेनेही आवश्यक ती काळजी घ्यावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
रेल्वे-बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही! रेल्वे-एसटी बसवर जाहिराती करणार
शहरातील रेल्वे आणि बस सेवा बंद करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. हॉटेल्स बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. ज्या गोष्टी करीत आहोत त्या जनतेच्या हितासाठी करीत आहोत. रेल्वेचे अधिकारी, एसटीचे अधिकारी यांची बैठक घेण्यात आली आहे. रेल्वे-बसमध्ये जंतुनाशक फवारणी तसेच अन्य उपाययोजनांचा आराखडा ठरवण्यात येत आहे. ज्याप्रमाणे टुरिझमसाठी ट्रेन रंगवली होती त्याचप्रमाणे कोरोना न होण्यासाठी काय करावे, काय करू नये, याबाबतच्या जाहिराती एसटी तसेच रेल्वेवर लावल्या जातील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अर्थव्यवस्थेला किती फटका बसणार?
अर्थक्यकस्था मंदीच्या फेऱयात असताना कोरोनाच्या संकटाचा परिणाम राज्याच्या अर्थक्यकस्थेकर होणार आहे. हे लक्षात घेऊन अर्थक्यकस्थेला मोठा फटका बसणार नाही या दृष्टीने उपाययोजना सुचकण्याचे आदेश राज्याच्या सचिवांना देण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
बोटांना निळी शाई लावण्याचा निर्णय काळजी म्हणूनच!
ज्यांना कॉरंटाईन करण्याची आवश्यकता आहे, मात्र ज्यांना हॉटेलमध्ये जायचे नाही ते समाजात मिसळू नयेत, त्यांनी वेगळे राहायला हवे यासाठी त्यांच्या बोटांना निळी शाई लावली जात आहे. गुणाकार पद्धतीने जगात या विषाणूचा प्रसार होतोय. अशा परिस्थितीत या लोकांनी समाजात मिसळू नये यासाठीच ही काळजी घेतली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यभरात 729 जणांना वेगळे ठेवले
सेव्हन हिल्स रुग्णालयात 1300 जणांसाठी तर हॉटेल्समध्ये 1000 बेड्स देण्यात आले आहेत. 2300 जणांची व्यवस्था होऊ शकेल, अशी व्यवस्था सध्या करण्यात आली आहे. राज्यभरात 108 लोकांना रुग्णालये तसेच हॉटेल्समध्ये वेगळे ठेवण्यात आले आहे. तर 621 जणांना त्यांच्या घरात वेगळे ठेवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी दिली.
n राज्यातील कोणत्याही शहरांना लॉकडाऊन करणार नाही किंवा पूर्णपणे शटडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही. तसेच हॉटेल बंद करण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही.
n रेल्वे-बसमधून अनावश्यक प्रवास टाळा. ऍम्युझमेंट पार्क बंद करण्यात आले आहेत. चौपाटय़ांवर बंदी आणलेली नाही. मात्र अनावश्यक गर्दी टाळा.
सर्वधर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवर भाविकांची गर्दी रोखा
राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी थांबवण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. यादृष्टीने मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा येथील नियमित पूजा-अर्चा सुरू ठेवून भाविकांची गर्दी रोखण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत.
पंचतारांकित हॉटेल्समध्ये विलगीकरण कक्ष
परदेशातून येणाऱया नागरिकांसाठी विमानतळाच्या आजूबाजूला असलेल्या हॉटेल्समध्ये विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विमानतळावरून येणाऱया ज्या प्रवाशांना हॉटेलमध्ये राहायचे आहे त्यांच्यासाठी जीव्हीकेचे हॉटेल, मिराज हॉटेल तसेच मराठा हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यांच्यासाठी पंचतारांकित हॉटेलचे दर न आकारता कमी दर आकारण्याबाबतच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्यांना हे दरही परवडत नसतील त्यांच्यासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे.
शेअर बाजार पुन्हा हादरला; गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी रुपये बुडाले
हिंदुस्थानात कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे हे पाहून गुंतवणूकदारांनी सोमवारी सकाळी बाजारात जोरदार विक्री केली. त्यामुळे शेअर बाजाराचा सेन्सेक्स 2000 अंकांनी कोसळला. निफ्टीतही 500 अंकांची घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे सहा लाख कोटींचे नुकसान झाले. कोरोनामुळे शेअर बाजाराला दुसऱयांदा हादरा बसला असून आठवडाभरात गुंतवणूकदारांना तब्बल 15 लाख कोटींचा फटका बसला आहे.
कोरोना रोखण्याचे उपाय सुचवा आणि एक लाख जिंका!
कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थानी जनतेला कोरोनावर उपाय सुचवण्याचे आवाहन केले असून ‘उपाय सुचवा आणि एक लाख जिंका’ असे ट्विट त्यांनी केले आहे. मोदी सरकारमधील मंत्र्यांनीदेखील पंतप्रधानांचे हे ट्विट रिट्विट केले असून त्याला हजारो लाईक्स मिळाले आहेत.
मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांमधील बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात आता प्रवेश मिळणार नाही. तसेच मंत्री व राज्यमंत्र्यांकडे फक्त 10 जणांना आणि सचिवांकडे फक्त पाच व्यक्तींनाच आरोग्य तपासणीनंतर प्रवेश देण्यात येईल. बाहेरील सरकारी अधिकाऱयांवरही निर्बंध घालण्यात आले असून त्यांनाही यापुढे मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही.
अत्यंत तातडीचे टपाल किंवा सरकारी संदेश हा ई-मेलवरच पाठवावा लागेल. दैनंदिन टपाल प्रवेशद्वारावरच स्वीकारण्यात येईल.
केईएम, कस्तुरबा परिसरात वाहतुकीवर निर्बंध
केईएम, कस्तुरबा आणि सेव्हन हिल्स रुग्णालयांच्या परिसरात वाहतुकीवर निर्बंध घालण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
मंत्रालयात कोरोना संशयित
मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका कर्मचाऱयाला आज तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात नेण्यात आल्याने इतर कर्मचारी धास्तावले आहेत. मंत्रालयातील या कर्मचाऱयांचा भाऊ अमेरिकेतून आला आहे. तो कोरोना पॉझिटिव्ह आहे. मंत्रालयातील या कर्मचाऱयाला ताप व कोरोनासदृश लक्षणे आढळून आल्यामुळे मंत्रालयातील दवाखान्यात या कर्मचाऱयाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात संशय आल्यामुळे या कर्मचाऱयाला पुढील तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात नेण्यात आले. कोरोनासदृश लक्षणांचा संशय आल्यामुळे फक्त वैद्यकीय चाचणीसाठी त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
नोटांऐवजी डिजिटल पेमेंट करा! रिझर्व्ह बँकेची सूचना
रिझर्व्ह बँकेने पेमेंट करताना नोटांचा वापर करू नका, असे जनतेला आवाहन केले आहे. नोटांऐवजी डिजिटल पेमेंट पर्यायांचा वापर करा. फंड ट्रान्स्फरसाठी एनईएफटी, आयएमपीएस, यूजीआय यांसारख्या पर्यायांचा वापर करा, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.