कोरोनाच्या प्रार्दुभावाला प्रतिबंधासाठी
नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे
पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे आवाहन
सोलापूर, दि. 17 : कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नागरिकांनी घाबरुन न जाता जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिका-यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाची असून रोगाचे हे संकट टाळणे यालाच सर्वोच्च प्राधान्य आहे. याक्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे. पालकमंत्री़ दिलीप वळसे-पाटील कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून, करावयाच्या उपाययोजनांबाबत वेळोवेळी सर्व संबंधितांना सूचना देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहे.
श्री. वळसे-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. आवश्यक औषधे , मास्क् व इतर यंत्रसामुग्री यांची मागणी आरोग्य विभागाला कळविण्यात आली आहे. क्वारंटाईन सेल आणि आयसोलेशन सेल तयार करण्यात आले आहेत. राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासन, सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषद यांना आवश्यक ती मदत पुरविली जाईल. गरज भासल्यास जिल्हा नियोजन समितीचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
श्री. पाटील यांनी सांगितले की कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 31 मार्चपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पालकांनी आपल्या मुलांना घराबाहेर गरज नसताना पाठवू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये किंवा गर्दी होईल, असे कार्यक्रम करु नये. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. जत्रा, यात्रा, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये. याबाबत राज्य शासन व जिल्हा प्रशासन यांनी जारी केलेल्या आदेशाचे पालन करावे.
कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावाबाबत समाजमाध्यमामधून कोणतीही माहिती पसरवू नये. कोरोना बाधित रुग्ण आढळलाच तर त्यांच्याबाबत कसलीही माहिती उघड करु नये. याबाबत आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनाचे तंतोतंत पालन करावे. सिनेमा थिएटर, मॉल सुरू ठेवू नयेत, असे आवाहनही पालकमंत्री वळसे-पाटील यांनी केले आहे.