दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे वयाच्या 67व्या वर्षी नवी दिल्लीत निधन झाले. सुषमाजींच्या निधनानंतर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देऊन शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही ट्विटद्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या. संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”
प्रकृतीच्या कारणांमुळे सुषमा स्वराज यांनी या वर्षी झालेली सर्वसाधारण निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. सन 2014 च्या निवडणुकीत त्या मध्यप्रदेशच्या विदिशा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या.