पंढरपूर – उजनी धरणात दौंड येथून येणार्या पाण्यात घट होत असून आता 1 लाख 60 हजार क्युसेकची आवक आहे. तर धरणातून 1 लाख 70 हजार आि वीरमधून 78 हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग आणखी घटण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमाकाठी सखल भागात पाणी शिरले आहे. पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील पूल पाण्याखाली गेल्याने मंगळवेढा व रांझणीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. येथे व्यापारी संकूल ही पाण्यात आहे. दरम्यान पंढरपूर तालुक्यात भीमा नदी दोन लाख सत्तर हजार क्युसेकने वाहत असल्याने नदीकाठच्या गावांतील शेतीत ही पाणी आले आहे तसेच काही ओढे भरल्याने यावरील पूल ही वाहतुकीसाठी बंद झाले होते.
उजनी व वीरमधून जे अडीच लाखाहून अधिक क्युसेक पाणी मागील दोन दिवसात सोडण्यात येत होते यामुळे भीमेची पातळी वाढली आहे. पंढरपूरला सर्व घाटांच्या पायर्या पाण्यात आहेत तर गोपाळपूर गावात पाणी आल्याने गोपाळकृष्ण मंदिराजवळील व्यापारी संकूल तसेच मंगळवेढा रोड वरील गोपाळपूरचा नवा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प आहे. नदीकाठच्या झोपडपट्यात पाण्याची पातळी वाढली आहे. ग्रामीण भागात ही अनेक ठिकाणी भीमेचे पाणी शेतांमध्ये शिरले आहे.
दरम्यान पुणे व सातारा भागात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक धरणांचे विसर्ग कमी करण्यात आले आहेत. खडकवासला धरणातून 27 हजार क्युसेक, चासकमानमधून 14 हजार क्युसेक पाणी सोडले आहे. अन्य धरणांमधून किरकोळ विसर्ग आहेत. पुणे बंडगार्डनचा विसर्ग पहाटे पाच वाजता 35 हजार क्युसेक होता. तर दौंडजचा विसर्ग जो दोन लाखाच्या वर होता तो ही हळूहळू कमी होत चालला आहे. सकाळी पाच वाजता 1 लाख 74 हजार क्युसेक पाणी उजनीत येत होते ते सहा वाजता 1 लाख 60 हजार क्युसेक झाले आहे. यात आणखी घट होईल. उजनी धरण 99 टक्के भरल्याने यात पाणी साठविण्याची क्षमता कमी असल्याने दौंडहून येणारी आवक ही थेट पुढे भीमा नदीत सोडली जात आहे. भीमा खोर्यातील पवना, मुळशीसारख्या मोठ्या प्रकल्पातून पाणी सोडणे तूर्तास तरी बंद आहे. यामुळे दौंडची आवक घटण्याची दाट शक्यता आहे. जस जसा ही आवक मंदावेल तस तसे भीमा नदीत पाणी सोडणे कमी केले जाईल.
नीरा साखळी धरण परिसरात ही पावसाचे प्रमाण कमी झाल्याने देवघर , भाटघरचे विसर्ग कमी झाले आहेत. वीरमधून 90 हजार क्युसेक पाणी जे सोडले जात होते ते कमी करून 78 हजार क्युसेेक करण्यात आले आहे. दरम्यान भीमा काठी पूरनियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज आहे. शेकडो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
भीमाकाठी असणारी पंढरपूर तालुक्यातील गावे
पेहे, आव्हे,नांदोरे, उंबरे, सांगवी, करोळे, कान्हापूरी,बादलकोट, गोपाळपूर, मुंढेवाडी,चळे,आंबे, सरकोली, तरटगाव, भटुंबरे, शेगाव दुमाला, देगाव, नारायण चिंचोली, इश्वरवठार, नळी, पंढरपूर, इसबावी,गुरसाळे, पटवर्धन कुरोली, देवडे, आंबेचिंचोली, सुस्ते, अजनसोंड, विटे, पोहोरगाव, पुळूज, तारापूर, शंकरगाव, खरसोळी,शिरढोण, कौठाळी, खेडभाळवणी, शेळवे, चिंचोली भोसे,वाडीकुरोली, वाखरी.