खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन
वृत्तसंकलन : गुरुराज माशाळ
रशिया : नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेल्या अति पूर्वेकडच्या भागाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदी यांनी एक अब्ज डॉलरचे कर्ज देण्याची घोषणा केली आहे. अति पूर्वेकडच्या भागाच्या विकासासाठी भारत रशियाच्या खांद्याला खांदा लावून काम करेल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची १५ दिवसांची सीबीआय कोठडी संपल्यानंतर त्यांना गुरुवारी दिल्लीच्या रोझ अव्हेन्यू कोर्टासमोर हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे चिदंबरम यांची आता दिल्लीच्या तिहार तुरुंगात रवानगगी करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधान सभेसाठी काँग्रेसचे 60 उमेदवार ठरले असून पहिली यादी 10 सप्टेंबरला जाहीर केली जाणार आहे. काँग्रेस नेते ज्योतीरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समितीची काल दिल्लीत बैठक झाली. या बैठकीनंतर ज्योतीरादित्य शिंदे यांनी ही माहिती दिली.
मुंबई : साहित्य प्रेमींच्या मनावर अधिराज्य निर्माण करणारे प्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार, पटकथा लेखक, नाटककार किरण नगरकर यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. किरण नगरकर हे ७७ वर्षाचे होते. त्यांच्या जाण्याने साहित्यक्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
मुंबई : शिवसेना-भाजप जागावाटपासाठी आता उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री आणि भाजप राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांच्यात चर्चा होणार आहे, आठवडाभरात तिघांची मुंबईत बैठक होणार असून, युतीच्या फॉर्म्युल्याबाबत अंतिम निर्णय मात्र अमित शाह घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील मित्रपक्षांसाठी भाजपा-शिवसेना १८ जागा सोडणार आहेत. या १८ जागांपैकी रिपाइंला १० जागा देण्यात याव्यात अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केली आहे. त्याचबरोबर ही निवडणूक रिपाइं भाजपाच्या चिन्हावर लढणार नाही तर स्वतःच्या चिन्हावर लढवेल असेही आठवले यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांना भाजपामध्ये मोठी पदे देण्यात आली आहेत. राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक यांची कोल्हापूर प्रदेश उपाध्यक्षपदी तर चित्रा वाघ यांची मुंबईच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी या नियुक्त्या जाहीर केल्या.
गुंटूर : आंध्र प्रदेशमधील एका महिलेचे वयाच्या ७३ वर्षी आई होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. लग्नाच्या 57 वर्षांनंतर त्यांनी काल जुळ्यांना जन्म दिला आहे. यापूर्वी 70 वर्षाच्या महिलेनं मुलाला जन्म दिल्याचा जागतिक विक्रम होता. या प्रसूतीनंतर मंगयाम्मा यांनी हा विक्रम मोडला आहे.
मुंबई : समाजातील एका विशिष्ट वर्गाकरिता काही दिवसांसाठी कत्तलखाने व मटणाची दुकाने बंद ठेवणे हे संविधानाच्या विरोधात नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायलयाने उपरोक्त मुद्यावर सदरील स्पष्टीकरण दिले.
मुंबई : पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जगभरात ऐरणीवर आलेल्या प्लास्टिक बंदीचा विषय महाराष्ट्राने अतिशय गांभीर्याने घेतला आहे. त्यामुळे येत्या 6 महिन्यात दररोजच्या वापरातील प्लास्टिक वस्तूंवर बंदी आणून महाराष्ट्र 100 टक्के प्लास्टिक मुक्तीच्या दिशेने वाटचाल करणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.
बंगळुरु : भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम, चांद्रयान-२ आता अखेरच्या टप्प्यात आहे. उद्या शनिवार, ७ सप्टेंबरला चांद्रयान-२ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि एकूण भारतासाठीच हा एक महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण असणार आहे.
नागपूर : येत्या 7 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर आहेत. याप्रसंगी ते मेट्रोच्या १० किमी मार्गाचे लोकार्पण करणार आणि त्यानंतर मेट्रो प्रवासाचा आनंदही लुटणार आहेत. मात्र, नागपूर मेट्रोला अजूनही प्रवाशी वाहतुकीचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळाले नाही. शिवाय मेट्रोमध्ये अग्निरोधक यंत्र नाहीत. तसेच अनेक आवश्यक बाबींची परवानगी नाही. त्यामुळे नागपूर मेट्रोतील पंतप्रधानांचा प्रवास असुरक्षित आहे. म्हणून हा प्रवास रद्द करण्याची मागणी एका सामाजिक संघटने कडून करण्यात आले आहे.
जळगाव : युतीच्या जागा वाटपाचे अंतिम सूत्र अद्याप निश्चित झालेले नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्रितरीत्या बसून त्याबाबत निर्णय घेतील. येत्या २ दिवसात जागा वाटपाचे अंतिम सूत्र ठरणार आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात दिली. तसेच मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेले वक्तव्य निरर्थक असल्याचेही महाजन म्हणाले.
कोल्हापूर-मुंबई कोकणासह महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे धरणातून पाणी सोडण्यात येत असत त्यामुळे सर्वच नद्यांना पूर आला आहे कोकणातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे आणखी चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे काही दिवसापूर्वी महापुराचा तडाखा बसलेल्या कोल्हापूर-सांगली पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे.
कोल्हापूर: काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पुतण्या ऋतुराज पाटील यांची उमेदवारी जाहीर केले आहेत. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून यंदा ऋतुराज पाटील हे रिंगणात उतरणार असल्याची घोषणा सतेज पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केली.
सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील 43 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शिक्षण समितीचे सभापती शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास महिला व बालकल्याण समिती सभापती रजनी देशमुख, समाज कल्याण सभापती शीला शिवशरण, पक्षनेते आनंद तानवडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, मुख्यलेखाधिकारी महेश अवताडे उपस्थित होते.
सोलापूर: लोकमंगल नागरी सहकारी आणि लोकमंगल फाउंडेशन यांच्यातर्फे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी शिक्षकरत्न पुरस्कार दिले जाणार आहेत. त्याची घोषणा बुधवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. या वर्षी विविध क्षेत्रातील 11 शिक्षकांना हे पुरस्कार दिले जाणार आहे हा पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी होणार आहे अशी माहिती डॉक्टर ह. ना. जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अक्कलकोट : येथील प्रसिद्ध सराफ व्यापारी रविकिरण शहा यांच्या घरी काही दिवसांपूर्वी मुद्देमालासह रोख रक्कम सात लाख रुपयांचे चोरी करून पसार झालेल्या तीन आरोपींना जेरबंद करण्यात अक्कलकोट पोलीस उपअधीक्षक संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कल्लप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाला यश आले आहे.
सोलापूर : आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्याच्या निवडणूक आराखडा तयार करावा अशा सुचना निवडणूक आयोगाचे निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हिडिओ कॉनफ्रान्सला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले उपस्थित होते.
सोलापूर : महारयत ऍग्रो कंपनीतर्फे कडकनाथ कुकूटपालन योजनेअंतर्गत सोलापूर शहर, जिल्ह्यासह राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे सुमारे 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक फसवणूक झाली आहे. त्यामुळे या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे शनिवार दिनांक 7 सात सप्टेंबर रोजी मोर्चा काढणार आहे. अशी माहिती वंचीत बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.