सामना अग्रलेख : पंतप्रधान मोदींना प्रश्न रावणाच्या लंकेत घडले; रामाच्या अयोध्येत कधी घडणार?

श्रीलंकेत भीषण बॉम्बस्फोट झाले असले तरी हिंदुस्थानला त्याचे हादरे बसले आहेत. शेजारधर्म तर आहेच, पण लंकेशी आपले धार्मिक आणि भावनिक संबंधदेखील आहेत. सरकारी आकडा काहीही असला तरी कोलंबोतील बॉम्बस्फोट मालिकेत पाचशेहून जास्त निरपराध्यांचा बळी गेला आहे. लिट्टेच्या दहशतवादातून मुक्त झालेला हा देश आता इस्लामी दहशतवादाचा बळी ठरला. हिंदुस्थान, विशेषतः हिंदुस्थानचा जम्मू आणि कश्मीर प्रांत त्याच इस्लामी दहशतवादाने त्रस्त आणि जर्जर झाला आहे. प्रश्न इतकाच आहे की, श्रीलंका, फ्रान्स, न्यूझीलंड आणि ब्रिटनसारखी राष्ट्रे जी कठोर पावले उचलतात तशी पावले आपण कधी उचलणार? विद्यमान सरकारने ‘ट्रिपल तलाक’विरोधात कायदा करून पीडित मुस्लिम महिलांचे शोषण वगैरे थांबवले हे मान्य, पण भीषण बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणार्‍या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी जाहीर केले. आम्ही या निर्णयाचे स्वागत करीत आहोत व पंतप्रधान मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी राष्ट्रहितासाठी करीत आहोत. फ्रान्समध्येही दहशतवादी हल्ला होताच तेथील सरकारने बुरखा बंदी केली. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात व ब्रिटनमध्येही हेच घडले आहे. मग याबाबतीत हिंदुस्थान मागे का? एक तर असंख्य मुस्लिम तरुणींना बुरखा झुगारायचा आहेच व दुसरे म्हणजे बुरख्याआडून नेमके काय सुरू असते याचा अंदाज येत नाही.

बुरख्यांचा वापर करून देशद्रोह, दहशतवाद घडवला जात असल्याची उदाहरणे समोर आली. तुर्कस्तान हे तसे इस्लाम मानणारे राष्ट्र, पण केमाल पाशाला बुरख्याआड काही घडत असल्याचा संशय येताच त्याने त्याच्या देशात मुसलमानी तरुणांची दाढी व बुरख्यांवर बंदी आणलीच होती. मुळात बुरख्याचा इस्लामशी काडीमात्र संबंध नाही व हिंदुस्थानातील मुसलमान अरबस्तानातील समाजव्यवस्थेचे अनुकरण करीत आहेत. अरबस्तानातील वाळवंट व उन्हांच्या तप्त झळांपासून बचाव करण्यासाठी महिलांनी चेहरा झाकून बाहेर पडण्याची प्रथा कधीकाळी पडली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चढतो तेव्हा सायकल, स्कूटरवरून प्रवास करणार्‍या तरुणी चेहर्‍यास ओढणी किंवा रुमाल गुंडाळूनच बाहेर पडतात. पण हे तेवढ्यापुरतेच असते. मात्र ‘नकाब’ किंवा ‘बुरखा’ घालणे हा जणू कुराणाचा आदेश आहे अशा भ्रमात किंवा अंधश्रद्धेत येथील मुसलमान वावरत आहेत. आपण कुराण वाचू लागलो की पदोपदी आपल्याला असा भास होतो की, आपण एखादा धर्मग्रंथ वाचीत नसून समाजव्यवस्थेसंबंधीचाच निबंध वाचीत आहोत. त्यात प्रामुख्याने सामाजिक प्रश्नांचीच चर्चा करण्यात आली आहे. त्या काळच्या अरबांची अवनत समाजव्यवस्था पाहून त्यांना एक सुव्यवस्थित समाजप्रणाली द्यावी या हेतूने प्रेषित मोहम्मदांनी हा ग्रंथ रचला असावा असे वाटते. अशाप्रकारे धर्म आणि समाजव्यवस्था यांची गुंतागुंत इस्लाममध्ये झाल्यामुळे सामान्य मुसलमान भांबावून जातो आणि धर्माप्रमाणे समाजव्यवस्थेचे नियम अपरिवर्तनीय नसल्यामुळे त्या नियमात बदल करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला तो आपल्या धर्मावरच घातलेला घाला वाटतो. उदाहरणार्थ, बहुपत्नी प्रथेला कोणी विरोध केला.

सक्तीच्या कुटुंबनियोजनाची भाषा ट्रिपल तलाक आणि बुरखा बंदीविरोधात कोणी आवाज उठवला तर इस्लाम संकटात आल्याची बांग मारली जाते. खरे म्हणजे मुसलमानांना त्यांचाच धर्म नीट समजलेला नाही असाच त्याचा अर्थ. (अर्थात काही हिंदूंच्या बाबतीतही तेच म्हणावे लागेल.) ‘राष्ट्र नंतर, आधी धर्म’ हा मुसलमान समाजाचा प्राधान्यक्रम आहे. पुन्हा हा धर्मदेखील फालतू रूढी-परंपरांच्या बेड्यात अडकलेला आहे. मुसलमानांत कोणी फुले, शाहू निर्माण झाले नाहीत. किंबहुना होऊ दिले गेले नाहीत. त्यामुळे शहाबुद्दीन, आझम खान, ओवेसी बंधू व अबू आझमी या धर्मांध माथेफिरू नेत्यांचे फावले. ही धर्मांधता व त्यांच्यातील रूढी, परंपरा राष्ट्रीय सुरक्षेच्या आड येत असतील तर त्या मोडून काढल्या पाहिजेत. मोदी यांनी हे सर्व करून घेतले पाहिजे. सर्जिकल स्ट्राइकइतकेच हे कार्य धाडसाचे आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रप्रमुखांनी ते केले. त्यांनी एका रात्रीत बुरखा बंदी केली. चेहरा झाकणार्‍या कोणत्याही गोष्टींमुळे व्यक्तीची ओळख पटण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून आपत्कालीन नियमांच्या अंतर्गत अशा गोष्टींवर प्रतिबंध केला जात असल्याचे श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी जाहीर केले. फेस मास्क किंवा इतर साधनांनी चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस व धैर्याचे दर्शन घडवले. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? पंतप्रधान मोदी आज अयोध्येला निघाले आहेत, म्हणूनच हा प्रश्न.

admin: