माढा: राज्यात नवे सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आपला ही या कर्जमाफी मध्ये खारीचा वाटा असावा म्हणून व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला माढ्यातील सहायक पोलिस फौजदार रमेश मांदे यांनी स्वतःचा एक महिन्याचा 44 हजार रुपये पगार देऊ केला आहे. मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारुन शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा विचार करावा असे आवाहन त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केले.
रमेश मांदे हे माढा पोलिस ठाण्यात सहायक पोलिस फौजदार म्हणून कार्यरत आहेत. ते शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशील असून त्यातूनच शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी नूतन मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे.
या पत्रात त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना उद्देशून आपण शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याबाबत सकारात्मक आहात. तो विषय सक्षमपणे हाताळला जात आहे असे बातम्यातून समजते. असा उल्लेख करत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी राज्याला आर्थिक अडचणी येत असल्याचे समजते आहे. त्यामुळे मी माझा एक महिन्याचा पगार यासाठी देण्यास तयार असून इतरही सरकारी कर्मचाऱ्यांचा पंधरा दिवसांचा पगार व लोकप्रतिनिधी यांचे पंधरा दिवसांचे मानधन यासाठी घ्यावे अशी विनंती त्यांनी केली आहे.
या पत्रातून पोलिसातील माणुसकीचे दर्शन झाले आहे. शेतकरी वर्ग हा सातत्याने निरनिराळ्या आस्मानी संकट व पिकांच्या भावातील चढ उतार यामुळे उद्विग्न होऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व चिंतामुक्तीसाठी नवनिर्वाचित सरकार त्यातील खास करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सकारात्मक आहेत.
त्यामुळे त्यांच्या समोरील आर्थिक अडचणी पाहता या पोलिस कर्मचाऱ्याने उचललेले हे पाऊल स्तुत्य असे आहे. ते इतरांसाठी मार्गदर्शक ठरेल असाच विचार सर्वच स्तरातील लोकांनी केला तर शेतकरी कर्जमुक्तीबरोबरच चिंतामुक्तही होईल असे मांदे यांनी म्हटलं आहे.