मुंबई । पंकजाताईंची भेट ही कौटुंबीक भेट, गोपीनाथ मुंडे हे माझे चांगले मित्र होते. पंकजाताई आणि रोहिणीताईंचा पराभव झाला, त्या कारणांवर चर्चा झाली. ज्यांनी पक्षाविरोधी कामगिरी केली, त्यांची नावं वरिष्ठांकडे पाठवली आहेत, आता कारवाईची प्रतीक्षा आहे. अस मत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पंकजा मुडेंच्या भेटीनंतर माध्यमांसमोर मांडले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पक्षाविरोधी कामं करणाऱ्यांची नावं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवली आहेत, त्यांनी चौकशी करुन विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. जे घडलं आहे, पक्षामध्ये जी अस्वस्थता आहे ती मी वरिष्ठांना कळवली असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
बहुजन नेतृत्त्वाला डावलणं हे दुर्दैवाने घडलं आहे, तिकीटं न देणे किंवा त्यांना पाडणे हे घडलं आहे, 105 जण निवडून आले, पण जर नीट नियोजन केलं असतं तर भाजपचे आणखी आमदार निवडून आले असते. अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. लोकांनी महायुतीला मतदान केलं होतं, महायुतीचाच मुख्यमंत्री व्हायला हवा होता, शिवसेनेला एक-दोन वर्ष मुख्यमंत्रिपद दिलं असतं, तरी प्रश्न सुटला असता. अशा शब्दांत खडसेंनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
जे यशाचं श्रेय घेतात, त्यांनी पराभवाचं पण घ्यावं, ज्यांनी नेतृत्व केलं, त्यांनी ती जबाबदारी घ्यावी. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोणत्याही सरकारचं किंवा विरोधकांचं कामकाज केवळ 8 दिवसात करता येणार नाही, देवेंद्रजी विरोधी पक्षनेते झाले त्यांचं अभिनंदन, उद्धवजी मुख्यमंत्री झालेत त्यांचंही अभिनंदन अस म्हणत त्यांनी पत्रकार परिषदेची सांगता केली.