शरद पवार म्हणाले मोदींनी ऑफर दिली होती, पण…

महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळे आणि अभूतपूर्व सरकार स्थापन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पहिल्यांदाच राज्यातील सत्तासंघर्षातील घडामोडींवर सविस्तरपणे बोलले आहेत.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची भूमिका आणि राजकीय वर्तुळातील धक्कादायक घटनांवर भाष्य केलं. माझे आदेश आहेत मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच असतील, असे म्हणणाऱ्या पवारांनी उद्धव ठाकरे ही जबाबदारी घेण्यास तयार नव्हते, असेही सांगितले. याशिवाय भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी खुद्द नरेंद्र मोदी यांनी ऑफर दिली होती, असा गौफ्यस्फोटही त्यांनी केला. आम्ही भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याबद्दल विचार करण्याचा काहीच प्रश्न नव्हता, असेही पवार यावेळी म्हणाले. कोणती ऑफर होती हे मात्र त्यांनी गुलदस्त्यातच ठेवले.    

महाराष्ट्रातील राजकीय नाट्य संपवत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या महिनाभर सुरु असलेला सत्तासंघर्ष संपला. राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना शरद पवारांनी दिल्ली दरबारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी आपण एकत्रितपणे काम करुयात, असे सांगत मोदींनी अप्रत्यक्षरित्या सोबत येण्याबाबत ऑफर दिल्याचे ते म्हणाले.  

या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढण्यात आले होते. तसेच राष्ट्रवादीचे मित्रपक्षांचेही यामुळे धाबे दणाणले होते. या भेटीबाबत शरद पवारांनी त्यावेळी ही भेट राजकीय नव्हती. भेटीदरम्यान अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेती आणि शेतकऱ्यांची चर्चा झाली असे सांगितले होते. या भेटीबाबत सविस्तर सांगताना ते म्हणाले की, पंतप्रधानांची वेळ मी यापूर्वीच मागितली होती.

पण मोदींनी नेमकी राजकीय तेढ निर्माण झालेला असताना भेटायला बोलावले. राज्यातील घडामोडींसदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी ही वेळ निवडली असेल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: