सरकारचा अहंकारी स्वभाव आपल्या देशालाच घेऊन बुडायला नको, रोहित पवारांची केंद्रावर टीका

मुंबई | शहरातील एका कार्यक्रमामध्ये उद्योगपती राहुल बजाज यांनी अमित शहांना प्रश्न विचारला होता. या प्रश्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. याविषयी आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. राहुल बजाज यांच्यासारख्या जेष्ठ आणि अनुभवी उद्योगपतींना आपल्या केंद्र सरकारची भीती वाटत असेल तर नक्कीच ही चिंताजनक बाब आहे असे ते म्हणाले. तसेच सरकारचा अहंकारी स्वभाव आपल्या देशालाच घेऊन बुडायला नको अशी भितीही त्यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, केंद्र सरकार मधील मंत्री सांगत आहेत त्याप्रमाणे बहुतेक तुम्ही चांगलं काम करत देखील असाल पण उद्योगधंद्यांची वस्तुस्थिती वेगळी आहे. उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाच उद्योगधंद्यांच्या खऱ्या समस्या माहित आहेत, आपल्या अनुभवाच्या जोरावर या समस्या सोडवण्यासाठी काही उपाय देखील हे लोक सुचवू शकतात असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, सरकार आणि उद्योगपती यांच्यात जर चांगला संवाद असेल, धंद्यासमोरच्या खऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याची सरकारची तयारी असेल तर देशाच्या आर्थिक विकासाला नक्कीच गती मिळू शकते पण यासाठी गरज आहे ती उद्योगपतींशी संवाद साधण्याची, त्यांची बाजू ऐकून घेण्याची. मला एकच भीती वाटते ती म्हणजे, आपल्या वरील टिका देखील न ऐकून घेण्याच्या या सरकारचा अहंकारी स्वभाव आपल्या देशालाच घेऊन बुडायला नको.

ग्लोबल न्युज नेटवर्क: