पंढरपूर :
भाटघर, नीरा देवघर आणि गुंजवणी या तिन्ही धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग रविवारी सकाळी 10 वाजता वाढवण्यात आला असून 60 हजार 800 क्यूसेक्स करण्यात आलेला आहे. नीरा लोणंद मार्गावरील जुना पूल पाण्याखाली गेला असून नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
शनीवारी पुन्हा निरेच्या खोऱ्यात दमदार पाऊस झाल्याने तिन्ही मुख्य धरणातील पाणी पातळी 95 टक्केपेक्षा जास्त झाल्याने शनीवारी पहाटेपासून वीरमधील विसर्ग वाढवण्यात आलेला होता. यात सायंकाळी 4 वाजता आणखी वाढ करण्यात आली आहे. निरा नदीमधे 41 हजार 800 क्युसेक्स पाणी विसर्ग सर्व 9 दरवाजातून सोडण्यात येत आहे. त्यामुळे नीरा नदीकाठी असलेल्या शेतकरी आणि गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आलेला आहे.
भाटघर धरणातून 1683 क्यूसेक्स, देवघर मधून 11571 क्यूसेक्स तर गुंजवणी धरणातून 7 हजार 237 क्यूसेक्स एवढे पाणी वीर धरणात येत आहे. त्याचबरोबर विरच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे विरमध्ये येणाऱ्या पाण्याचा विसर्ग 55 हजार क्यूसेक्स पेक्षा जास्त झाल्याने रविवारी पहाटे 2 वाजता विरमधून 65 हजार क्यूसेक्स पाणी सोडले होते. त्यात सकाळी 10 वाजता कपात करून 60 हजार 210 क्यूसेक्स ने पाणी सोडले जात आहे. शनिवारी नीरा खोऱ्यातील नीरा देवघर 142 मिमी, भाटघर 27 मिमी तर गुंजवणी धरनावर 100 मिमी एवढा पाऊस पडला आहे त्यामुळे तिन्ही धरणातून वीर मध्ये पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती नीरा उजवा कालवा विभागाकडून देण्यात आलेली आहे. दरम्यान निरेतील पाणी पातळी वाढल्याने नीरा लोणंद मार्गावरील जुना पूल पाण्याखाली गेला आहे तसेच नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. फलटण, माळशिरस, बारामती तालुक्यातील प्रशासनाने नदीकाठी सतर्कतेचा ईशारा दिला असून नदी लगत असलेल्या काही गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.