मुंबई । राज्यपाल यांच्याकडून ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेली खरीप पिकांना प्रति हेक्टरी 8 हजार रुपये आणि फळबागांना हेक्टरी 18 हजार रुपये मदत तुटपुंजी असल्याचे सांगत हेक्टरी25 हजार मदत द्यावी अशी मागणी शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
जाहीर झालेल्या मदतीतून शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार नाही, ही मदत तोकडी असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागणी केल्याप्रमाणे सरसकट हेक्टरी 25 हजार रूपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सोबतच, नुकसान झालेल्या शेतातील जुन्या पिकांचे अवशेष बाहेर काढणे, शेतातील गवत व इतर कचरा साफ करून रब्बी हंगामसाठी शेती पेरणी योग्य करण्यासाठी मनरेगा / रोजगार हमीतून मदत करण्यात यावी असंही शिंदे यांवेळी म्हणाले.
यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सडकून टीका केली आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाडयासह राज्यभरातील जवळपास 92 लाख शेतकरी बाधीत झालेले आहे. हातात आलेली पिके पूर्ण वाया गेली आहे. सोयाबिन, मुग, उडीद, कापूस, मका, फळ बागांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असतांना राज्यपालांनी मात्र हेक्टरी फक्त 8 हजार रूपये जाहिर केली आहे. ही शेतकऱ्यांची थट्टा असून जाहीर झालेली मदत अतिशय तुटपूंजी आहे. राज्यपालांनी नुकसानीचा विचार करून शेतकऱ्यांना ताबडतोब 25हजार रूपये प्रति हेक्टर मदत करणे गरजेचे आहे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे