दौड: प्रचारा दरम्यान मोदींनी आमच्यावर टीका केल्याने आम्हाला भोकं पडत नाहीत. मोदी आपल्या भाषणात बेताल वक्तव्य करतात. मात्र राजकारणात आपल्याला सन्मान देणाऱ्या सामान्य माणसाला दुखावून चालणार नाही याचा विसर मोदींना पडला आहे. राजकारणात टीकाटिप्पणी नक्की करावी. मात्र भलतीकडे बोट केल्यास ते महागात पडू शकेल, याची काळजी मोदींनी घ्यावी सूचना वजा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना दिला.
आज दौंडमध्ये संयुक्त महाआघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.
पवार म्हणाले,तरुणतुर्कांना राष्ट्रवादीमध्ये महत्त्व देण्याची आमची भूमिका आहे. पन्नास वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाने मला तिकिट दिले. तरुणांना तिकिट का दिल्याची चर्चा जनतेत होती. यावर देश घडवण्यासाठी आम्ही नवीन फळी पुढे आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले. हाच प्रयत्न आज मी करत आहे, याचा अभिमान मला वाटतो.