मुंबई: मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस शुक्रवारी रात्रीपासून वांगणी जवळ अडकली आहे. पावसाचे पाणी रुळांवर मोठ्या प्रमाणावर साठल्याने ही एक्स्प्रेस पुढे जाऊच शकलेली नाही. या एक्स्प्रेसमध्ये ७०० प्रवासी अडकले असून एनडीआरएफच्या चार तुकड्या या सगळ्यांच्या सुटकेसाठी या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकारने नौदल आणि हवाई दलाला प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यासाठी मदत पाठवण्याची विनंती केली होती. त्यानंतर नौदलाने प्रवाशांच्या बचावासाठी आपली चॉपर्स पाठवली आहेत. दरम्यान, आतापर्यंत 700 ते 750 प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.मुंबई-पुणे प्रवास टाळण्याच्या प्रशासनाच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
दरम्यान, नौदलाची आठ बचाव पथके या ठिकाणी रवाना करण्यात आल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली. तसेच यामध्ये तीन डायव्हिंग टीमसह बचाव सामग्री, इन्फ्लॅटेबल बोट्स आणि लाइफ जॅकेट्सदेखील पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, नौदलाचा पश्चिम विभाग या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच आवश्यक पुरग्रस्त भागांमध्ये आवश्यक ती मदत पुरवण्यासाठी नौदल राज्य प्रशासनाच्याही संपर्कात असल्याची माहिती नौदलाने दिली आहे.
पहाटे तीन वाजल्यापासून रेल्वे रुळावरच असल्याची माहिती आम्हाला मिळाली. काही लोक दोरी आणि बचाव कार्यासाठी लागणारे साहित्य घेऊन आले आहेत. पहाटेच्या तुलनेत आत्ता रुळांवर साठलेले पाणी सहा इंचांपर्यंत कमी झाले आहे. पाणी ओसरत असल्याने सध्या काळजी वाटत नाही मात्र पाणी वाढले एक्स्प्रेसही पुढे जाईना तेव्हा आमच्या काळजाचा ठोका चुकला होता असं रेल्वेत अडकलेला प्रवासी स्वप्निल लुगडे याने सांगितलं आहे. स्वप्निल जुना बुधवार पेठ, कोल्हापूरचा रहिवासी आहे.