महाराष्ट्रातील आणि एकूणच मोदी सुनामीची १२ कारणे!

  • संजय आवटे- राज्य संपादक दिव्य मराठी

कॉंग्रेसने ऐनवेळी शिवसेनेतून आयात केलेल्या बाळू धानोरकरांनी लाज राखली नसती, तर ‘कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्रा’चे भाजपचे स्वप्न सिद्धीस जाऊ शकले असते. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणा-या आणि अगदी आणीबाणीतही पाठराखण करणा-या या राज्यात कॉंग्रेस शब्दशः भुईसपाट झाली आहे. देशातल्या डझनभर राज्यांत कॉंग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.. ‘पर्याय’ म्हणून स्वतःला सिद्ध करण्यात कॉंग्रेसला आणि विरोधकांना आलेले अपयश हे या निकालाचे मुख्य कारण आहे.
२०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट निर्माण झाली, त्याला सुस्पष्ट कारण हे होते की मोदी नावाचा नवा नायक देशाला मिळाला होता. या नायकाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, गेल्या पाच वर्षांत फक्त अपेक्षाभंगच झाले. देशाची कल्पनाच धोक्यात आली. अशावेळी या असंतोषाचा फटका मोदींना बसेल, अशी खात्री निर्माण होत गेली. दरम्यानच्या काळात मोदी- शहांच्या घरच्या मैदानावर झालेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची दमछाक झाली. अगदी कसाबसा विजय मोदींना मिळवता आला. गेल्या पाच- सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकांत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत झालेल्या विधानसभांमधील भाजपची सत्ता गेली. तिथे कॉंग्रेसला दणदणीत विजय मिळाला. त्यापूर्वी कर्नाटकातही निकालानंतर अमित शहांनी सुरू केलेले निवडणूक व्यवस्थापनाचे प्रयोग विरोधकांनी हाणून पाडले. भाजपला पराभूत करता येऊ शकते, त्यांचे सगळे व्यवस्थापन हाणून पाडता येऊ शकते, असा आत्मविश्वास विरोधकांच्या मनात निर्माण झाला. राहुल गांधींची प्रतिमा या कालावधीत उजळत गेली. त्यांच्या पत्रकार परिषदा, भाषणांमधून एक परिपक्व नेता दिसत गेला आणि विरोधकांचा आत्मविश्वास दुणावत गेला. उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यांच्यासारखे पारंपरिक विरोधकही एकवटले. तिकडे चंद्राबाबू, केसीआर, ममता अशा नेत्यांना भाजपच्या पराभवाची खात्री पटली. शरद पवारांसारखा दिग्गज नेता कधी नव्हे ती थेट भूमिका घेऊ लागला.
२३ मे हा दिवस सगळ्याच अर्थांनी महत्त्वाचा होता. अनपेक्षित निकाल लागणार, असा अंदाज होता आणि तसा तो लागलाही. मात्र, अनपेक्षित निकाल या अर्थाने लागला की, ही निवडणूक म्हणजे ‘मोदी लाट’ नव्हे, तर ‘मोदी त्सुनामी’ ठरली. २०१४ च्या निवडणुकीपेक्षा या वेळच्या भाजपच्या जागा वाढणार नाहीत, असा सर्वांचा होरा होता. तज्ञ अशीच मांडणी करत होते. ग्राउंड रिपोर्टही यापेक्षा वेगळे नव्हते. प्रत्यक्षात जे घडले ते मात्र कमालीचे वेगळे ठरले.
देशाप्रमाणेच महाराष्ट्रातही भाजपने बुलंद विजय मिळवत कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला भुईसपाट केले. गेल्या निवडणुकीत भाजप – शिवसेनेकडे ४२ जागा होत्या आणि आघाडीकडे सहा. यावेळी आघाडीच्या जागा तेवढ्याच राहिल्या. मात्र, कॉंग्रेसची स्थिती आणखी बिकट झाली. एवढी बिकट की, दोन माजी मुख्यमंत्री पराभूत झाले. राष्ट्रवादीची स्थिती तुलनेने बरी खरीच, पण पवारांच्या घरात पहिल्यांदाच पराभव वस्तीला आला.
निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा, माध्यमांचा गैरवापर, पैशांची अमाप उधळपट्टी अशी कारणे विरोधकांकडून दिली जात असली, तरी त्यामुळेच हे निकाल लागले, असे अनुमान काढणे पुरेसे नाही.

कारणे काय?

१. वंचितचे संचित!

महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर, वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक ठरली. राज्यातील ४८ मतदारसंघांपैकी ४१ मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडी तिस-या क्रमांकावर आहे. नांदेड, सोलापूर, परभणी, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, सांगली, हातकणंगले अशा किमान दहा मतदारसंघांमध्ये वंचितच्या उमेद्वारांमुळे आघाडीला फटका बसला आहे.

२. कॉंग्रेस – राष्ट्रवादीचा ताठरपणाः

नगरमध्ये राष्ट्रवादीऐवजी क़ॉंग्रेसच्या सुजय विखेंना आणि औरंगाबादेत कॉंग्रेसऐवजी राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाणांना अशी अदलाबदल झाली असती, तर या दोन्ही जागा जिंकणे आघाडीला शक्य झाले असते. हे फक्त एक उदाहरण. मुद्दा असा की, मोदी नि शहा नितीशकुमार वा उद्धव ठाकरेंसमोर एकेका जागेसाठी नमत असताना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र ते भान नव्हते.

३. निष्प्रभ नेतृत्वः

महाराष्ट्रात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण सुरुवातीपासूनच पराभूत मानसिकतेत वावरत होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले. तिकडे विजयसिंह मोहिते – पाटील यांच्यासारखा दिग्गज नेता भाजपमध्ये गेला. राष्ट्रवादीने तरीही त्वेषाने निवडणूक लढवली, कॉंग्रेस मात्र निकालापूर्वीच पराभूत झाली होती. त्यातही आर्थिक आघाडीवर कॉंग्रेस कधी नव्हे एवढी दुबळी भासली.

४. ‘ना’ राज!

राज ठाकरेंनी राज्यभरात अकरा सभा घेतल्या. त्यापैकी सातारा, रायगड आणि बारामती वगळता कोणताही उमेद्वार विजयी होऊ शकला नाही. राज यांच्या सभांना उदंड प्रतिसाद मिळाला, पण लोक यावेळी नकारात्मक मूडमध्ये नव्हते. यांना मत देऊ नका, हे खरे, पण मग मत द्यायचे कोणाला, पर्याय कोण, हाच मुद्दा पुढे आला. शिवाय, राज यांना फार गंभीरपणे घ्यावे, असे त्यांचे ट्रॅक रेकॉर्ड नव्हते.

५. पर्याय कोण?ः

या निवडणुकीत मोदींचा तो करिष्मा नाही, याचे भान खुद्द मोदी आणि शहांनाही होते. पण, मोदी नसतील, तर मग पर्याय काय, असा सवाल उपस्थित करण्यात मोदींच्या टीमला यश आले. ‘पर्याय कोण?’ या प्रश्नाला समाधानकारक उत्तर अखेरपर्यंत मिळू शकले नाही. या उत्तराला तोंड देताना विरोधकांच्याही नाकीनऊ आले. अध्यक्षीय पद्धतीचे स्वरुप या निवडणुकीला देण्यात मोदी टीमला यश आले. मोदींनी गेल्या पाच वर्षांत अपेक्षेप्रमाणे काम केले नाही हे खरे, पण मोदी नसतील तर कोण? संपूर्ण अंधारच! असे पर्सेप्शन तयार करणे सोपे गेले.

६. मोदी निष्कलंक, फकीर!

अण्णा हजारेंना लोकप्रियता मिळत असताना, अण्णांचे एकटे असणे, संसार नसणे लोकांच्या लेखी फार महत्त्वाचे असते. अशा संन्यस्त वृत्तीच्या लोकांविषयी सर्वसामान्य माणसांना कमालीचा आदर असतो. तो भ्रष्टाचार करणार नाही, याची खात्री असते. संसाराचा पाश नसणारे जयललिता, मायावती यांच्यासारखे नेते आपण पाहिले असले तरी हा समज कायम आहे. मुख्य म्हणजे, आपली संन्यस्त, फकीर अशी प्रतिमा मोदींनी तयार केली. शिवाय, सिद्ध झालेला कोणताही गैरव्यवहार मोदींच्या नावावर नाही. ‘चौकीदार चोर है’ ही घोषणा कितीही गाजलेली असली तरी मोदींची ‘निष्कलंक’ प्रतिमा बदलण्यात विरोधकांना यश आले नाही. उलटपक्षी मोदींविषयीची सहानुभूतीच त्यामुळे वाढली.

७. विरोधकांविषयी संशय

मोदींची प्रतिमा निष्कलंक, निर्मोही आणि त्याचवेळी विरोधक मात्र सारे भ्रष्ट. आणि, हे सर्व भ्रष्ट विरोधक या प्रामाणिक नेत्याच्या विरोधात एकवटलेले आहेत, असे पर्सेप्शन तयार होत गेले.

८. आणखी एक संधी देऊः

सरकारी योजनांचा प्रचार आणि लाभार्थ्यांना मतदार करून घेण्याची रणनीती यामुळे देशात काहीतरी घडू लागले आहे, असे जनमत तयार होत गेले. शहरांमध्ये ठिकठिकाणी सुरू असणारी मेट्रोची कामे, इतर विकासकामे लक्षात घेता ‘मेरा देश बदल रहा है’ याची खात्री वाटत गेली. आणखी एक संधी मोदींना द्यायला हवी, असे वातावरण तयार होत गेले.

९. कणखर ‘राष्ट्रवाद’:

निवडणूक राष्ट्रवादावर घेऊन जाण्यात मोदींना यश आले. मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे, पाकिस्तानला मोदीच तडाखेबंद उत्तर देऊ शकतात आणि मोदींमुळे जागतिक पातळीवर देशाची मान उंच झाली आहे, असा समज निर्माण करून देण्यात मोदींना यश आले. त्यामुळे जातींची गणिते उद्ध्वस्त झाली आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जनमत एकवटले.

१०. पोलिटिकल कम्युनिकेशनः

मोदींनी महाराष्ट्रात नऊ सभा घेतल्या, तर उद्धव ठाकरेंनी पंधरा सभा घेतल्या. त्याशिवाय अमित शहा, देवेंद्र फडणवीसांनीही झंझावाती दौरे केले. असे स्टार प्रचारक कॉंग्रेसकडे नव्हते. राहुल गांधी वगळता आणि राज ठाकरे यांच्या सभांचा होऊ शकणारा फायदा वगळता, कॉंग्रेसकडे असा कोणताही नेता नव्हता. जिथे डॉ. अमोल कोल्हेंसारखा स्टार प्रचारक उमेद्वार होता, तिथे तो ‘जाएंट किलर’ ठरला. पण, असा प्रभावी प्रचारक आघाडीकडे इतरत्र नव्हता. याउलट भाजपचे प्रचारक प्रभावी ठरले. लोकांशी कनेक्ट साधण्यात त्यांना यश आले. मुख्य म्हणजे, मोदींच्या भाषणांनी, मीडिया फ्रेंडली संवादाने जादू केली. माध्यमांची भूमिकाही महत्त्वाची ठरली. आता आकडेवारी हाताशी नाही. पण, तरुण आणि महिलांची पहिली पसंती मोदी हीच होती.

११. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका

लोकसभा निवडणुकांनंतर विधानसभा निवडणुका महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे भाजप – शिवसेनेच्या विद्यमान आमदारांनी आपल्या सर्व क्षमतेसह काम केले. महाराष्ट्रातील सर्व मंत्री, सत्ताधारी युतीचे १८५ आमदार मनापासून राबले. बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्थाही भाजप – शिवसेनेकडे आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिकसह बहुतेक बड्या महानगरपालिका भाजप – शिवसेनेकेडे आहेत. असे सर्व नेते, विधानसभेसाठी उत्सुक असणारे उमेद्वार, भाजपने उभे केलेले सर्व जातींचे नेते आपल्या कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह या निवडणुकीत उतरले.

१२. भाजपचे पक्षसंघटन आणि आघाड्या

पक्षसंघटनेची तुलना करता भाजपच्या समोर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची तयारी अगदीच सामान्य होती. भाजप- शिवसेना यांच्या केडरसमोर आघाडीचा निभाव लागणे निव्वळ अशक्य होते. शिवाय, पक्ष म्हणून भाजप नेहमीच ‘इलेक्शन मोड’मध्ये असतो. निवडणुका जिंकण्याचे एक शास्त्र आता त्यांनी विकसित केले आहे. आघाड्या करताना भाजपने नमती भूमिका घेत भविष्यवेधी शहाणपणाचा विचार केला. मोदी आणि फडणवीस हे पक्षाला मिळालेले चेहरे त्यांच्या निवडणूक व्यवस्थापनासाठी अत्यंत पूरक ठरले. यापैकी काहीही कॉंग्रेसकडे नव्हते. राहुल गांधी एकाकी खिंड लढवत असताना, बाकी पक्षसंघटना मात्र मलूल झालेली होती.
अशा कारणांमुळे महाराष्ट्रातील (आणि, देशातीलही) मोदी त्सुनामीत कॉंग्रेस वाहून जाणे स्वाभाविकच होते

admin: