मला बार्शीचा चेहरा मोहरा बदलायचाय तुमची साथ हवीय — राजेंद्र राऊत
बार्शी: माझ्या राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना गेली पंचवीस वर्षांपासून बार्शी शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी व बार्शी शहराला विकसनशील बनवण्यासाठी सर्व जाती धर्म, पंथांच्या लोकांना सोबत व एकत्रित घेऊन काम केले व भविष्यातही करत राहणार आहे.
बार्शीच्या राजकारणात काम करताना मी नेहमीच शहर व तालुक्यात शांतता कशी नांदेल याकडे लक्ष देऊन काम केले. बार्शी शहरामध्ये अनेक जाती धर्माची लोक गुण्यागोविंदाने नांदत असून, मी नेहमीच या सर्वांमध्ये जातीय सलोखा टिकविण्याचा प्रयत्न केला.बार्शी शहरात कधीही जातीय भेदभाव निर्माण होऊ दिला नाही, जेणेकरून बार्शी शहराची शांतता बिघडेल याची दक्षता घेतली. सर्वांनी गुण्यागोविंदाने व सुखसमाधानाने रहावे हेच माझे सामाजिक व राजकीय काम करताना ध्येय राहिले आहे असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केले.
बार्शी शहरातील महेदी नगर, मलिक चौक येथील प्रचार सभेत ते बोलत होते.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, याउलट तालुक्याच्या माजी लोकप्रतिनिधींनी कायमच जाती धर्मांत, भावा-भावात, गावा-गावात, कुटुंबांत भांडणे लावून आपली राजकीय पोळी भाजून घेतली. विरोधकांनी कायम शहर व तालुक्यात जातीयवादाचे विष पेरण्याचे काम केले. या भांडणाचा फायदा उचलत त्यांनी तालुक्यात राज्य केले. परंतु त्यांच्या या वाईट प्रवृत्तीच्या विरोधात मी तुम्हां जनतेच्या पाठिंब्यावर 25 वर्षे ठामपणे उभा राहिलो आहे.
आता विरोधकांचे खरे जातीयवादी रुप जनतेसमोर आले असून, केवळ सत्तेच्या लालसेने त्यांनी पक्षांतर केले आहे.त्यांचा खरा चेहरा आता उघड झाला आहे. त्यांच्या या उघड झालेल्या ख-या चेह-याला जनतेने ओळखले असून, या विधानसभा निवडणुकीत जनता त्यांचा नक्कीच पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही याचा मला विश्वास व खात्री निर्माण झाली आहे.
मला बार्शी शहराचा चेहरामोहरा बदलून, बार्शीचे एक रोल मॉडेल तयार करावयाचे आहे. त्यादृष्टीने मी सर्व सहका-यांच्या मदतीने नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात कोट्यवधी रुपयांची अनेक विकासकामे सुरू असल्याची माहिती त्यांनी सांगितली.भविष्यातसुद्धा बार्शी शहरातील कोट्यवधी रुपयांची अनेक विकास कामे कशा पद्धतीने केली जाणार आहेत याची माहितीही त्यांनी दिली.या विकास कामांच्या जोरावरच मी या निवडणुकीत तुमच्यासमोर मतदानरूपी आशीर्वाद मागण्यासाठी ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी हे चिन्ह घेऊन उभा आहे. मला खात्री आहे की, तुम्ही मला आशिर्वाद देऊन नक्की विजयी करणार आहेत.
यावेळी नगराध्यक्ष अॅड.आसिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, बाबासाहेब कथले,प्रकाश मनगिरे,रज्जाक पठाण,रज्जाक बाबुडे,महदवी साहेब, सुभाष लोढा,कय्युम पटेल,इम्रान मुल्ला, नवनाथ चांदणे,दिपक राऊत व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi