शेतकर्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा शिवसेनेचा वचननामा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी जाहीर केला. 10 रुपयांत सकस जेवण, एक रुपयात आरोग्य चाचणी, 300 युनिटपर्यंत विजेच्या दरात 30 टक्क्यांची कपात, ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी बससेवा आणि शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याबरोबरच दुर्बल घटकातील शेतकर्यांच्या खात्यावर दरवर्षी दहा हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन वचननाम्यातून देण्यात आले.
‘वचननाम्यातील वचने ही सरकारी तिजोरीचा विचार करूनच देण्यात आली आहेत. यातील एकही वचन खोटे ठरणार नाही. शिवसेना जे करू शकते तेच बोलते आणि जे बोलते ते करते,’ अशी ग्वाहीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज इथे दिली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, राज्याच्या तिजोरीवर किती भार पडेल याचा विचार करूनच हा वचननामा तयार करण्यात आला आहे. 10 रुपयांत चांगले सकस जेकण हे स्कच्छ आणि क्यकस्थित असेल. जेवण देण्यासाठी सेंट्रलाइज किचन व्यवस्था उभारण्यात येणार आहे. असे असले तरी यासाठी बचत गटांचीही मदत घेतली जाणार आहे. कशाचाही समतोल ढळणार नाही याचा विचार करूनच पूर्णपणे जबाबदारीने हा वचननामा तयार करण्यात आला आहे.
यावेळी ही संकल्पना ‘अम्मा की रसोई’तून आली का, असा प्रश्न विचारण्यात आला असता उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वांचा आवडता वडापाव स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याची संकल्पना शिवसेनेचीच. पण आपल्याकडे काय होतं, याचं कौतुक करण्यापेक्षा तिथे काय होतं याचंच कौतुक आपल्या लोकांना अधिक असतं. हा वचननामा अत्यंत प्रामाणिकपणाने आणि जनतेला न्याय देणारा आहे. देशाला मंदीचा विळखा पडत असताना रोजगाराचाही मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत जनतेला आधार कसा देता येईल यासाठी हा वचननामा असून ते वचन कसं पूर्ण करणार हे कौशल्य आमचं आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, सूरज चव्हाण, उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी आदी उपस्थित होते.
पाच वर्षांतील अनुभवातूनवचननामा तयार
हा वचननामा बनवताना पाच वर्षांत महाराष्ट्रभर फिरताना आलेले अनुभव, पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त भागांतील परिस्थिती. तेथील लोकांच्या मागण्या तसेच लाखो लोकांचे प्रश्न जाणून घेऊन तयार करण्यात आला आहे. त्यानुसार हा वचननामा आठ महिला, चार पुरुष यांनी एकत्र बसून तयार केला असून यासंदर्भात शिवसेना नेते, उपनेते आणि शिवसैनिकांशी चर्चा करण्यात आली आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
200 आरोग्य चाचण्या एक रुपयात
मधुमेह, हृदयविकार यासह आरोग्याशी संबंधित 200 प्राथमिक चाचण्या ज्या आज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत त्या सर्व चाचण्या एक रुपयात उपलब्ध करून दिल्या जातील. त्याचप्रमाणे शेतकर्यांना कर्जमुक्त करणार असून दुर्बल घटकातील शेतकर्यांच्या खात्यात दरवर्षी दहा हजार रुपये जमा करणाऱ जाहीरनाम्यात सर्व घटकांचा विचार करण्यात आला असून आशासेविकांची मानधनवाढ, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनांचाही समावेश असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
पाच वर्षे चांगल्या पद्धतीने सरकार चालवून जनतेला न्याय देऊ
शिवसेनेने ज्याप्रमाणे वचननामा जाहीर केला आहे त्याप्रमाणे भाजपचाही जाहीरनामा लवकरच घोषित करण्यात येईल. त्यामध्येही अनेक चांगल्या योजना असतील. त्यांचाही आम्ही स्वीकार करू. पुढील पाच वर्षे आम्ही एकत्र राहून अत्यंत चांगल्या पद्धतीने सरकार चालवून जनतेला न्याय देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण कोकणात फिरणार
पत्रकारांनी कणकवलीतील प्रचार सभेविषयी विचारले असता, मी संपूर्ण कोकणात फिरणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कटुता दूर करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांना केले असल्याबाबत विचारले असता हे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे, आम्ही नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आरेसाठी सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे
आरेचा विषय वचननाम्यात नाही, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता आदित्य ठाकरे यांनी प्रत्येक जिह्याप्रमाणे जो वचननामा आहे त्यात मुंबईच्या वचननाम्यात आरेचाही उल्लेख असल्याचे सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, आरेतील निसर्गाचा प्रश्न हा सर्व मुंबईकर आणि सर्व पक्षांचा प्रश्न आहे. शिवसेनेने तेथील वृक्षतोडीला विरोध केला आहे. अन्य पक्षांच्या नेत्यांनीही यासाठी पुढे यावे, आम्ही येतो आणि मग काय तो निर्णय घेऊ.
आम्ही तुम्हाला वचन देतो…
महिला
आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य
तरुण
35 वर्षांखालील तरुणांना हक्काच्या घरासाठी म्हाडात 2 टक्के आरक्षण
गृहनिर्माण
मुख्यमंत्री आवास योजना आणून प्रत्येकाला स्वतःचे घर देणार
शेतकरी
दुर्बल घटकातील शेतकर्यांच्या खात्यात प्रतिवर्षी 10 हजार जमा करणार
शिक्षण
तालुका स्तरावर गाव ते शाळा, महाविद्यालयात पोहोचण्यासाठी 2500 ‘विद्यार्थी एक्प्रेस’ बस
आरोग्य सुविधा
सर्व जिह्यांत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार
उद्योग व रोजगार
सरकारी नोकरीतील सर्व स्तरातील सर्व रिक्त पदे भरणार
गृह विभाग
आठवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या धर्तीवर प्रशिक्षण
ग्राम विकास
रस्ते बारमाही टिकाऊ करणार. गावाच्या प्रत्येक वाडीपर्यंत एम-60 रस्ते
शहर विकास
मुंबई शहरातील पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गांचे काँक्रीटीकरण
वीज पुरवठा
300 युनिटपर्यंत वापर करणार्या ग्राहकांसाठी घरगुती वीज दर 30 टक्क्यांनी कमी
सामाजिक न्याय
धनगर, ओबीसी, भटके-विमुक्त, बंजारा, कोळी, लिंगायत, कुणबी, मुस्लिम ओबीसी, बलुतेदार यांचे प्रश्न सोडवणार
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi