मंत्रिमंडळाचा विस्तार होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या नव्या कॅबिनेट ची पहिली बैठक घेतली. यानंतर बोलताना त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकमताने खातेवाटप निश्चित केले आहे. त्यामुळे कोणला कोणते खाते, याची अधिक चर्चा नको. उद्या किंवा परवा तुम्हाला ते कळेलच, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली मंत्रिमंडळ बैठक आज मंत्रालयात पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सर्व मंत्री व राज्यमंत्री यावेळी उपस्थित होते.
वाचा : हसन मुश्रीफ आणि जयंत पाटील यांना ‘हे’ मंत्रिपद?
जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते आज आपल्या राज्य मंत्रिमंडळात असून ही एक ‘बेस्ट टीम’ आहे, या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत भावना व्यक्त केल्या.
वाचा : ‘या’ तीन महिला आमदारांना मंत्रिमंडळात स्थान
ठाकरे सरकारच्या शपथविधी सोहळ्यावर भाजपने बहिष्कार टाकला होता. त्याबाबत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी, आता त्यांच्याकडे दुसरे काम तरी कोणते उरले आहे?, असा सवाल केला. आम्ही जे करतो ते उघडउघड करतो. भिंती रंगवणे एवढेच काम आम्हाला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
कर्जमाफी योजनेवरही त्यांनी भाष्य केले. नियमित कर्ज भरण्यांसाठी नवी योजना आणू. २ लाखांच्या वर कर्जधारकांसाठी कर्जमाफीची योजना आणू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३४ मधील अनुसूचित जाती-जमातीच्या संदर्भातील राखीव जागांबाबत अनुसमर्थन करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन ८ जानेवारी २०२० रोजी बोलवावे, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.