शरद पवारांच्या या कृतीने सभेला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सातारा इथं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसाठी सभा पार पडली. या सभेवेळी तिथं जोरदार पावसाने हजेरी लावली. पण पाऊस कोसळत असतानाही शरद पवार यांनी आपलं भाषण सुरुच ठेवलं. शरद पवारांच्या या कृतीने सभेला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या उर्जेसाठी ओळखले जातात. वयाच्या 79 व्या वर्षीही ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यामुळे अनेकजण आश्चर्यही व्यक्त करतात. त्यातच आता सातारा इथल्या शरद पवार यांनी पाऊस सुरू असतानाही केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा होत आहे.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की,सातारा लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. विधानसभेचे उमेदवार दीपक पवार आणि लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना आपल्याला जिंकून आणायचेच आहे.
येत्या २१ तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साक्षात वरुणराजाने देखील आज आशीर्वाद दिले. त्याच्या आशीर्वादाने सातारा जिल्हा महाराष्ट्रात चमत्कार करणार आणि याची सुरुवात २१ तारखेपासून होणार, याचा मला विश्वास आहे.
एखाद्या माणसाकडून चूक झाली तर ती चूक कबुल करायची असते. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्याकडून चूक झाली हे मी जाहीरपणाने कबुल करतो. पण मला आनंद आहे, की ती चूक सुधारण्यासाठी साताऱ्याचा प्रत्येक माणूस २१ तारखेची वाट बघत आहे असे ही पवार म्हणाले.