‘बिजापूर डायरी’त आदिवासींच्या सामाजिक आरोग्याचा शोध : शिरसाठ
सचिन अपसिंगकर / एच सुदर्शन
बार्शी : डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी छत्तीसगड मध्ये शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना घेतलेल्या अनुभवांवर आधारीत बिजापूर डायरी या पुस्तकात आदिवासींच्या शारिरिक, मानसिक व सामाजिक आरोग्याचाही शोध घेण्याचा प्रयत्न आहे. असे मत साधना नियतकालिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी व्यक्त केले.
बस्तर व दंतेवाडा भागातील आपल्या अनुभव आणि कार्य कथन असे स्वरुप असलेल्या बिजापूर डायरी या डॉ. ऐश्वर्या रेवडकर लिखित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष अॅड. असिफ तांबोळी, बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, लोकबिरादरी प्रकल्पाच्या संचालिका समीक्षा गोडसे-आमटे, बचपन बचाओ’ संस्थेचे प्रवर्तक प्रणित सिन्हा, लोकसाहित्याच्या अभ्यासक व डॉ. ऐश्वर्याच्या आई प्रा. भारती रेवडकर, पिता प्रा. दिलीप रेवडकर, बंधू डॉ. युवराज रेवडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविकामध्ये प्रा. भारती रेवडकर यांनी नक्षलवादग्रस्त भागात वैद्यकीय सेवा करण्याचा निर्णय अत्यंत धाडसाने घेताना डॉ. ऐश्वर्याने आम्हांलाही नवा जीवनविषयक दृष्टीकोन दिला. व आज ती आमच्या सर्व कुटुंबाची मार्गदर्शक आहे, असे सांगितले.
यावेळी लेखिका डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी आदिवासींच्या निसर्गपूरक जीवनशैलीमध्ये बदल करणे, योग्य नाही. आदिवासी सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृध्द आणि श्रीमंत आहेत. पुस्तकात आदिवासींच्या सद्य:स्थितीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे, असे सांगितले.
यावेळी सिन्हा म्हणाले, १३० कोटी लोकसंख्येपैकी १० टक्के असलेल्या आदिवासींचे जीवन हाच खरा मुख्य प्रवाह आहे. स्त्रीभ्रुण हत्या न करणारे, जातव्यवस्था न मानणारे आदिवासी हे खरे आधुनिक आहेत. केवळ मॉल आणि इंडस्ट्री म्हणजे विकास नव्हे. आदिवासींच्या जीवनपध्दतीशी सुसंगत असे विकासाचे नवे मॉडेल तयार करावे लागेल. बिजापूर डायरीत डॉ. ऐश्वर्याच्या सामाजिक जाणीवेचे प्रतिबिंब आहे. अशा पुस्तकातून नक्षलग्रस्त भागाबाबत माध्यमांनी निर्माण केलेला भ्रम पुसुन टाकण्याचे काम होईल.
यावेळी आदिवासी भागात जिल्हाधिकारी म्हणून काम करणार्या डॉ. ऐयाज तांबोळी यांचे पिता फकीर तांबोळी यांनी आपल्या कामामुळे डॉ. ऐश्वर्या आमची मानसकन्या झाली. तिने आदिवासींची जीवन समजून घेण्याचा चांगला प्रयत्न केला आहे, असे सांगितले.
यावेळी संयोजकांच्यावतीने समाजातील वंचित घटकांसाठी काम करणारे कॉ. तानाजीराव ठोंबरे, पर्यावरणप्रेमी मधुकर डोईफोडे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी घाडगे यांना गौरविण्यात आले. यावेळी डॉ. अमित पडवळ व डॉ. सुमित पडवळ यांनी लेखिकेचा गौरव केला. प्रा. किरण गाढवे यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.