बळीराजाला दिलासा, राज्यपालांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर

मुंबई ।अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांना पिकवार नुकसान भरपाई मिळायला हवी. अशी मागणी राज्यभरातील शेतकरी वर्ग करत आहे. अशातच आज राज्यपालांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली आहे. दोन हेक्टरपर्यंतच्या खरिप पिकांसाठी 8 हजारांची मदत देण्यात येणार आहे तर, फळबागांसाठी 18 हजारांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. फळबागा आणि बारमाही पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 18000 रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार असल्याचे राजभवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.  मदतीचे लवकरच वाटप होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याशिवाय परीक्षा शुल्क आणि शेतसारा माफ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. मात्र तूर्तास शेतकऱ्यांना सरकारने किंचित असा दिलासा दिला आहे. परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काहीप्रमाणात दिलासा दिला आहे. 



मराठवाड्यातील तब्बल ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील जिरायती, बागायती व फळपिकांना फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीची भरपाई मदतरूपात देण्यासाठी मराठवाड्याला २९०४ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीची गरज पडणार आहे. पिकांचे पंचनामे करून नेमके किती नुकसान झाले, शेतकऱ्यांना किती मदत करावी लागेल, याचा अहवाल दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाने सादर केला आहे. पीकस्थितीचे नुकसान लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी बांधावर भेटी सुरू करताच प्रशासनाची धावपळ सुरू झाली. यानंतरच पंचनाम्याला देखील गती आली.

यंदाच्या खरिपात ५० लाख २० हजार ५९१.६६ हेक्टरवर खरिपाची प्रत्यक्ष पेरणी झाली होती. या क्षेत्रापैकी ४० लाख ४७ हजार हेक्टरवरील जिरायती, ६९ हजार ४११ हेक्टरवरील बागायत, तर ३२ हजार हेक्टरवरील फळपिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती निवारणाच्या नियमांच्या अधीन राहून २९०४ कोटी ४० लाख ४३ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: