फडणवीसांच्या टीकेला जयंत पाटलांचे उत्तर म्हणाले आम्ही थोडे थोडे करून..

नव्या सरकारने शेतकऱ्यांशी बेईमानी केली असून हे सरकार फार काळ टीकणार अशी टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘सध्या फडणवीस यांना कोणतेच काम नाही, पण त्यांचे मनसुबे कदापि यशस्वी होणार नाहीत’, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

पालघर येथे झालेल्या भाजप कार्यकर्त्याच्या मेळाव्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकाला लक्ष्य करत जोरदार टीका केली होती. यावर बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले की, ‘देवेंद्र फडणवीस यांना सध्या कोणतेही काम नाही. मला त्यांच्याविषयी पूर्ण सहानुभूती आहे. ताळमेळ नसल्यामुळे सरकार फार काळ टिकणार नाही असे फडणवीसांचे म्हणणे आहे. मात्र, असेच थोडे थोडे दिवस करून आम्ही पाच वर्षांचा कार्यकाळ नक्की पूर्ण करू.’, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, नव्या सरकारने शेतकऱ्यांशी बेईमानी केली आहे. सरकारने जनादेशाचा विश्वासघात केला आहे. हा विश्वासघात फक्त जनादेशाचा नाही तर शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच, जनतेने या सरकारचा राजकीय सातबारा कोरा करुन यांना घरी पाठवले पाहिजे, असे देखील फडणवीस यांनी म्हटले होते. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये एकही शेतकरी बसत नसल्याचा आरोप देखील फडणवीस यांनी केला होता.

ग्लोबल न्युज नेटवर्क: