पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे गरजेचे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३३ कोटी वृक्षलागवडीच्या राज्यव्यापी कार्यक्रमाला वरोरा येथील आनंदवनातून सुरुवात

वरोरा: : दहा वर्षापूर्वी पर्यावरणासंदर्भात गांभीर्याने चर्चा सुरू असताना त्याचे चटके अल्पावधीतच इतक्या गंभीरतेने भोगावे लागेल याची कल्पना नव्हती. मात्र आता पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे या पिढीचे कर्तव्य असून वृक्षलागवडीच्या या मोहिमेत प्रत्येकाने आपले दायित्व द्यावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

स्वर्गीय बाबा आमटे यांच्या कर्मभूमीतून,आनंदवनातून ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या राज्यस्तरीय मोहिमेचा वृक्षारोपण करून त्यांच्या शुभहस्ते शुभारंभ झाला.
सोमवारी सकाळी आनंदवन येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या अटल आनंद घन-वन योजनेचा शुभारंभ वृक्षारोपणाने केला. शहरी भागात घनदाट जंगल निर्माण करण्यासाठी जपानच्या धर्तीवर मियावाकी वृक्षलागवड पद्धतीची देखील आजपासून वन विभागाकडून सुरुवात करण्यात आली.

यावेळी त्यांनी आनंदवनातील स्वर्गीय बाबा आमटे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन त्यांना आदरांजली व्यक्त केली. आनंदवनातील प्रदर्शनीला देखील त्यांनी भेट दिली. त्यानंतर वन विभागातर्फे आयोजित 33 कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ,वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, खा. अशोक नेते, आ. नानाभाऊ शामकुळे, आ. कीर्तीकुमार भांगडिया, आ. अॅड. संजय धोटे ,आनंदवनचे विश्वस्त डॉ.विकास आमटे, डॉ. शीतल आमटे -करजगी,सिंगापूरचे कॉन्सिल जनरल गॅवीन चाय, इस्त्रायलचे कॉन्सिल जनरल याकोव फिंकलेस्टीन, अमेरिकेचे व्हाईस कॉन्सिल जनरल रॉबर्ट पॉल्सन, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक उमेश अग्रवाल, मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, गायत्री परिवाराचे ज्येष्ठ डॉ. कालीचरण शर्मा, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, वरोऱ्याचे नगराध्यक्ष ऐहतशाम अली, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, संजय देवतळे आदींची उपस्थिती होती.

वृक्षप्रेमींना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ३३ कोटी वृक्ष लागवड ही महत्वाकांक्षी संकल्पना आहे. पत्रकारांनी या ठिकाणी पोहोचल्यानंतरच विचारले की, आनंदवनातूनच ही ३३ कोटी वृक्ष लागवडीची सुरुवात का केली जात आहे….तर ज्या नावातच वन आणि आनंद दोन्ही आहे. त्या आनंदवनाने स्वर्गीय बाबा आमटे यांच्या मार्गदर्शनात मन दुभंगलेल्या वंचितांच्या जीवनात आनंद देण्याचे काम केले. त्यामुळे यापेक्षा चांगले स्थळ आणखी कोणते असू शकते? असे आमच्या मनात आले. त्यामुळेच या समाज उपयोगी मोहिमेची सुरुवात आनंदवनातून करण्याचा निर्णय घेतला.
ते म्हणाले,चार वर्षांपूर्वी वनविभागामार्फत ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प जेव्हा करण्यात आला. तेव्हा ही पुन्हा एक राजकीय घोषणा असावी असे सर्वांना वाटले. मात्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा उपक्रम लावून धरला. लवकरच ५० कोटी वृक्ष लागलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. सध्या वाढत्या तापमानमुळे पर्यावरण समतोल बिघडतोय.हे समजून घेतले पाहिजे. त्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. यामुळे निसर्ग संतुलन बिघडले आहे. त्यासाठी पर्यावरण -हास टाळलाच पाहिजे.

पुढच्या पिढीसाठी झाडे लावली पाहिजे. यातून दुष्काळावर मात करता येईल. आता जागे होण्याची वेळ आहे. धरती वाचविण्यासाठी प्रदूषण पातळी खाली आणली पाहिजे. यासाठी कार्बन उत्सर्जन कमी केले पाहिजे. पुढच्या पिढीच्या संवर्धनासाठी आता झाडे लाऊया, असे आवाहन त्यांनी केले.

 १० वर्षापूर्वी पर्यावरणाच्या ऱ्हासाची गंभीरता जाणवत नव्हती. मात्र आता त्याचे दृष्य पारिणाम दिसाताहेत. निसर्गाचे संतुलन ज्या घटकाने बिघडवले त्या घटकाचा बदला पर्यावरण स्वतःहून घेते. त्यामुळे पर्यावरणाला जपणे अतिशय आवश्यक आहे. अन्यथा पर्यावरण आपला बदला घेईल.

कधीकाळी चंद्रपूर सारख्या जिल्हामध्ये पावसाची कमी नव्हती. परंतु आता चंद्रपूर सारख्या जिल्ह्यांमध्ये अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन हा अतिशय चिंतेचा विषय असून गंभीर दखल घेत काम करणे आवश्यक आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे आजची सर्वाधिक गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्व देशांना कार्बनचे प्रमाण २० टक्के कमी करण्यासाठी भारत प्रयत्न करेल,असे अभिवचन दिले आहे. मोदीजींच्या या घोषणेला जागतिक स्तरावरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता वृक्ष लागवडीच्या या मोहिमेमध्ये सर्वांचा सहभाग अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक नवीन अॅप तयार करावे. या ॲपच्या माध्यमातून राज्यातला प्रत्येक नागरिक किती कार्बनचा विसर्ग करतो व पर्यावरण संवर्धनासाठी काय काम करतो याची नोंद घेतली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी भाषणाच्या शेवटी केली.

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात वन विभागाने गेल्या चार वर्षात केलेल्या वृक्षसंवर्धन व वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे त्यांनी यावेळी कौतुक केले. यावर्षी निश्चितच 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण होईल. त्यात 33 कोटी पेक्षा अधिक वृक्षलागवड होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
ग्लोबल न्युज नेटवर्क: