मुंबई : राज्यात सत्ता संघर्षाचा तिढा सुरू असताना भाजपने सत्ता स्थापनेला अजूनही पुढाकार घेतलेला नाही. तसेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. पण राज्यात राष्ट्रपती राजवट लागू नये यासाठी कोणाला तरी पुढाकार घ्यावा, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी राज्यातील नवीन समिकरणाबाबत अजूनही उत्सुक नसल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेसमोर एक नवीन पर्याय उपलब्ध केला जाईल असे दिसत आहे.
राज्यात सत्तेचे नवीन समिकरण निर्माण होताना काँग्रेस श्रेष्ठींनी होकार दिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एका नवीन पर्यायावर विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आघाडी करून काँग्रेस बाहेरून पाठिंबा देऊ शकते किंवा काँग्रेसमधील दोन तृतांश आमदार म्हणजे २८ आमदारांनी वेगळा गट तयार करून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला पाठिंबा दिल्यास हे गणित सुटू शकते. अशा वेळी उरलेल्या १६ काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहात उपस्थित न राहता आपला पाठिंबा जाहीर न केल्यास हे सरकार सहज स्थापन होऊ शकतो.
पाहा काय आहे समिकरण
यानुसार शिवसेनेचे ५६ आमदार + त्यांना पाठिंबा देणारे ८ आमदार + राष्ट्रवादीचे ५४ आमदार + काँग्रेसने २८ आमदारांचा वेगळा गट निर्माण करून आघाडीला पाठिंबा दिला. तर ही संख्या १४६ होते. त्यामुळे अशा परिस्थित बहुमतापेक्षा दोन आमदार जास्त होतील आणि हे नवीन समिकरण राज्यात निर्माण होऊ शकते.
काँग्रेसच्या २८ आमदारांनी वेगळा गट निर्माण केला आणि त्यांनी या नवीन आघाडीला पाठिंबा दिला तर पक्षांतर बंदी कायदा या परिस्थितीत लागू होत नाही. तसेच आम्ही पाठिंबा दिलाच नाही असे काँग्रेसचे श्रेष्ठी म्हणू शकतात. त्यामुळे देशात शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा दिल्याचा ठपका काँग्रेसवर लागणार नाही आणि भविष्यात आपल्या विचारांवर कायम असल्याचे सांगत ते उजळ माथ्याने फिरू शकतात. त्यामुळे हा पर्याय भविष्यात शक्य होऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे.
या संदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने येत्या १२ नोव्हेंबर रोजी मुंबईत आपल्या सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत या नवीन पर्यायावर चर्चा होण्याची शक्यता आहे.