करवीर तालुका आणि शिरोळ तालुक्यातील कुटुंबांच्या स्थलांतरणाला वेग
कोल्हापूर । मुसळधार पावसामुळे कोल्हापूरला पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण झाला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी धोका पातळीकडे वाटचाल करत असून ती सध्या 39 फूट 9 इंच इतकी झाली आहे. पंचगंगेची धोका पातळी ही 43 फूट असून लवकरच नदी या पातळीकडे जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील 68 बंधारे पाण्याखाली गेले असून मागच्या 24 तासांत तब्बल 335.57 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप उघडेच असून नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
महापुराच्या धास्तीने नागरिकांनी स्थलांतरास सुरुवात केली आहे. तर कोल्हापूरमधील राधानगरी, कोयना धरणे भरूली असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 65 बंधारे पाण्याखाली गेल्याने 20 मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे सात बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे व तारळे हे पाच बंधारेही पाण्याखाली गेले आहेत.
तुळशी नदीवरील बीड, आरे व बाचणी हे तीन बंधारे देखील पाण्याखाली आहे. कासारी नदीवरील करंजफेण, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ- तिरपण, ठाणे-आवळे व यवलुज हे सहा बंधारे आणि कुंभी नदीवरील शेणवडे, कळे (खा), वेतवडे, मांडुकली, सांगशी व कातळी हे सहा बंधारे, तसेच धामणी नदीवरील सुळे व आंबर्डे हे दोन बंधारे पाण्याखाली आहेत. वारणा नदीवरील चिंचोली, माणगांव, कोडोली, चावरे, मांगले सावर्डे, तांदूळवाडी, शिगाव, खोची व दानोळी हे नऊ बंधारे, कडवी नदीवरील सवते सावर्डे, शिरगाव, कोपार्डे व बाचणी हे चार बंधारे आणि दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सिंध्दनेर्ली, सुळकुड, बाचणी, कसबा वाळवे, तुरंबे आणि सुळंबी हे सात बंधारे पाण्याखाली आहेत. वेदगंगा नदीवरील कुरणी, सुरुपली बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, शेळोशी आणि वाघापूर हे आठ बंधारे, हिरण्यकेशी नदीवरील खंदाळ, ऐनापूर, गिजवणे व निलजी हे चार बंधारे आणि घटप्रभा नदीवरील तारेवाडी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे आणि आडकुर हे चार बंधारे पाण्याखाली आहेत.
ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी व हल्लारवाडी असे एकूण ६७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या तीन तुकड्यांना नदीकाठच्या गावांजवळ तैनात केल्या आहेत. नदीकाठच्या 129 आणि पूरबाधित 363 गावांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
अलमट्टीच्या विसर्गात वाढ
वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, राज्यातील ज्या भागात अतिवृष्टी होत आहे, तेथील परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष आहे. अलमट्टी धरणातून एक लाख ७० हजार क्युसेक (एक क्युसेक म्हणजे २८.३१ लिटर) वेगाने पाणी सोडण्यात येत होते. कोल्हापूरमधील पुरसदृश्य स्थिती टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याची विनंती महाराष्ट्र सरकारने केली होती. त्यामुळे आता विसर्ग वाढवला असून, सध्या धरणातून दोन लाख २० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
असा आहे विसर्गाचा तपशील
१) राधानगरी धरण – विसर्ग 4256 क्युसेक
२) तुळसी धरण – विसर्ग – 1011 क्युसेक
३) कुंभी धरण- विसर्ग-950 क्युसेक
४) कासारी धरण – विसर्ग-1100 क्युसेक
5) दुधगंगा – विसर्ग-5400 क्युसेक
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.