नागरिकांनी अतिउष्ण वातावरणात घराबाहेर पडू नये , प्रशासनाचे आवाहन,नागरिकांनो घ्या काळजी

टीम ग्लोबल न्युज :- सध्या वातावरणातील उष्णता खूप जास्त वाढलेली आहे आणि उष्णतेची तीव्रता लक्षात घेता उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहेत. यासाठी शासन स्तरावरून प्रशासनासाठी तसेच जनतेसाठीही काही सूचना देण्यात आल्या आहेत.

उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी खालील उपाययोजना करण्यात याव्यात-

   उष्णतेच्या लाटेची माहिती घेण्याकरिता रेडिओ, टीव्ही, सोशल मीडिया व स्थानिक वृत्तपत्रे या प्रसारमाध्यमांचा प्राधान्याने वापर करण्यात यावा. जिल्हा नियंत्रण कक्ष, महानगरपालिका नियंत्रण कक्ष, विभागीय स्तरावरील नियंत्रण कक्ष व स्थानिक संस्था आणि आरोग्य विभाग यांनी एकत्रित समन्वयाने कार्य करावे. सर्व संबंधित विभाग, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संस्था या सर्वांनी जनतेसाठी या कार्यात पुढे होऊन सामील व्हावे.

   काय करावे- तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करावा, प्रवास करताना पाण्याची बाटली नेहमी सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनिशी डोके, मान व चेहरा झाकावा, शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, तोरणी,लिंबू पाणी, इत्यादी चा नियमित वापर करावा, अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे आहेत, हे लक्षात घ्यावे आणि चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून तात्काळ योग्य ते उपचार घ्यावेत, गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी देत राहावे, घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करावा, रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात, पंखे, ओले कपडे, यांचा वापर करावा तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे, कामाच्या ठिकाणी जवळ थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना तसे सूचित करावे, पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामांचा निपटारा करून घ्यावा, बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये थोडीशी विश्रांती घेऊन नियमितपणे आरामही करावा, गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी, रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत, जागोजागी पाणपोईची सुविधा करावी.

काय करू नये- लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क असलेल्या वाहनात ठेवू नये, दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत उन्हात बाहेर जाणे प्रकर्षाने टाळावे, गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत.

नागरिकांनी उष्णतेच्या लाटेपासून स्वत:चे संरक्षण होण्यासाठी प्रशासनाने ज्या उपाययोजना सांगितल्या आहेत,त्याप्रमाणे स्वत:ची काळजी घ्यावी,असे आवाहन उस्मानाबाद च्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे,व सोलापूर चे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

admin: