जायकवाडी धरणात पाण्याचा ओघ सुरूच, जिल्ह्यात पाऊस नसताना ही धरण 80 टक्के भरले

पैठण: जायकवाडी धरणात 11 व्या दिवशीही पाण्याचा ओघ सुरूच आहे. शनिवारी दिवसभर 31 हजार 627 क्युसेक्सने जलौघ दाखल झाल्याने जलाशयाची टक्केवारी 80 पर्यंत पोहोचली आहे.

रात्री ऊशिरानंतर वरच्या प्रकल्पातून पाण्याची आवक वाढल्याने पाणीसाठा 80 टक्क्यांच्या पुढे पोहचला आहे. रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 63,332 क्युसेकने आवक सुरू असून पाणीसाठी 80.17 टक्के झाला आहे. तर नाथसागरात 73,789 क्युसेकने आवक होत आहे.

एकुण 1522 फूट जलसाठवण क्षमता असलेल्या या प्रकल्पात 29 जूलैपासून पाणी येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे 1492 फूटांपर्यंत घसरलेली पाणीपातळी 11 व्या दिवशी 1518.15 फूट एवढी झाली आहे. पाणीसाठ्यात एकूण 26 फूटांनी वाढ झाली आहे. जायकवाडीच्या 50 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या विक्रमी गतीने पाणीपातळी वाढली आहे. धरण पूर्ण भरण्यासाठी आता केवळ 4 फूट पाणीपातळीची गरज आहे. 462.732 मी. असलेल्या या पाणीसाठ्यात सध्या प्रतिसेकंद 63,332 क्युसेक्स याप्रमाणे नवीन पाणी येत आहे.

धरणात एकुण पाणीसाठा 2399.780 दशलक्ष घनमीटर एवढा असून वापरायोग्य (जिवंत पाणीसाठा) जलसाठा 1661.674 दशलक्ष घनमीटर आहे, अशी माहिती धरण नियंत्रण कक्षातून जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता बुध्दभुषण दाभाडे यांनी दिली. नांदुर मधमेश्वर व नागमठाण या धरणातून जलविसर्ग वाढवण्यात येणार असल्याने जायकवाडीच्या नियंत्रण कक्षातील यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे.

जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून काल रात्री 9 पासून माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. हा जलविसर्ग 400 क्युसेक्सवरुन दुपारी 3 वाजता 600 क्युसेक्स प्रतिसेकंद करण्यात आला आहे. रात्री यात पुन्हा वाढ करून 900 क्युसेक्स प्रतिसेकंद केला जाणार आहे. नाथसागरमधून माजलगाव धरणात एकुण 75 दशलक्ष घनमीटर (अडीच टीएमसी) एवढे पाणी देण्याबाबत जलसंपदा मंत्रालयातून सूचना आलेल्या आहेत. त्यानुसार हे पाणी सोडण्यात येत आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या दगडी धरण उपविभागाचे स्थापत्य अभियंता राजाराम गायकवाड यांनी दिली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: