शिरपूर । अनेक वर्षापासून बंद असलेल्या शिरपूर सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न शील आहे. असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. ते धुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी शिरपुर तालुक्यातील करवंद येथे प्रचारासाठी आले होते यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद निवडणुक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने धुळे जिल्ह्यात विविध पक्षाच्या नेत्यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. करवंद येथील प्रचार सभेसाठी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार अनिल पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, गृहखातं सांभाळायला मला काहीही अडचण नव्हती. परंतू आमच्या पक्षांनी जाणीवपूर्वक विदर्भातील नेत्यांना ही जबाबदारी दिली आहे. विदर्भात आमचा पक्ष अधिक वाढावा आणि विदर्भातील असंख्य कार्यकर्ते आमच्या पक्षाचं समर्थन करतात आमच्या दृष्टीने तेही कार्यकर्ते, नेते आमच्यासाठी महत्वाचे आहेत अशी भूमिका शरद पवार साहेबांनी घेतली. खातेवाटपापूर्वी गृहमंत्रिपद हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयं पाटील यांना मिळेल अशी चर्चा होती. मात्र, गृहमंत्रिपदाची माळ अनिल देशमुख यांच्या गळ्यात पडली आहे. गृहमंत्रिपदाची जबाबदारी ही अनिल देशमुख यांच्यावर देण्यामागच्या गारणाचा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे.
कोण आहेत गृहमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणारे अनिल देशमुख
दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून रखडलेला राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार पार पडल्यानंतर सगळ्यांनाच खातेवाटपाचे वेध लागले होते. अखेर आज सकाळी खातेवाटप जाहिर करण्यात आले असून अनेक महत्वाची खाती पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन, अनिल देशमुख यांच्याकडे गृह, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या सर्व खातेवाटपात सर्वांचेच लक्ष होते ते म्हणजे सर्वांत महत्वाचे असणारे गृह खाते. गृह खाते आपल्याला मिळावे यासाठी अजित पवार आग्रही होते अशीही माहिती आहे. मात्र शरद पवार यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू अनिल देशमुख यांच्यावर गृहमंत्रालयाची जबाबदारी टाकली आहे. मात्र अनेकांना अनिल देशमुख यांच्याविषयी फारशी माहिती नाही. त्यांच्या राजकिय कारकीर्दीचा थोडक्यात घेतलेला आढावा.
राजकिय कारकीर्द
69 वर्षीय अनिल देशमुख हे पहिल्यांदा 1995 मध्ये आमदार झाले. त्याआधी नागपूर जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष होते. देशमुख यांच्या गाठीशी संसदीय राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. युती सरकारच्या काळातही त्यांनी सांस्कृतिक मंत्रिपद यशस्वीपणे सांभाळलेले आहे. नंतर 1999 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वात अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात त्यांनी विविध खात्यांची धुरा समर्थपणे वाहिली. 1999 ते 2001 या काळात शालेय शिक्षण, माहिती व जनसंपर्क विभागाचे राज्यमंत्रिपद, 2004 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्यानंतर 2009 मध्ये अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार त्यांनी सांभाळला. त्यांच्या गाठीशी असलेला हा दीर्घ अनुभव लक्षात घेऊनच शरद पवार यांनी गृहमंत्रिपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.