खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन
वृत्तसंकलन:गुरुराज माशाळ
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 च्या तरतुदी हटवल्यानंतर आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केल्यानंतर आता राज्यात तणावपूर्व शांतता आहे. शांततेत बाधा आणण्याच्या शक्यतेने राजकीय नेते, कार्यकर्ते अशा 100 हून अधिक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरचे विभाजन आणि कलम 370 रद्द केल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नॅशनल सिक्युरिटी कमिटीसोबत बैठक घेतली. या बैठकीत पाकिस्तानने भारता सोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राजनैतिक संबंधांचा दर्जा घटवणार असल्याचंही पाकिस्तानने म्हटलं आहे. याशिवाय भारताचे उच्चायुक्त अजय बीसारिया यांची हकालपट्टी करण्याची निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे.
नवी दिल्ली: चीनच्या हुआवेई टेक्नॉलॉजी या कंपनीस भारतात व्यवसाय करण्यास बंदी घालू नये, हुआवेईवर बंदी घातलीत तर चीनमधील भारतीय कंपन्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा चीनने भारताला दिला आहे. अमेरिकेच्या दबावामुळे भारताने हुआवेईवर भारतात बंदी घातली तर, चीन देखील आपल्या देशातील भारतीय कंपन्यांवर प्रतिबंध लादू शकतो.
मुंबई : पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा पथकांवरील हल्ले वाढवण्या बरोबरच मुंबईलाही लक्ष्य करु शकते अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिली आहे. यामुळे केंद्राने राज्य पोलिसांना महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबई : ‘संजय गांधी निराधार अनुदान योजना’ आणि ‘श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजने’तील विधवा आणि वृद्धांच्या अनुदानात भरीव वाढ करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रतिवर्षी 1,648 कोटींच्या खर्चासही मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. दुर्गम भागात आदिवासी पाड्यांमध्ये तसेच पुरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये अन्न धान्य, पिण्याचे पाणी आदि सुविधा पुरविण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठात 2019-20 साठी घेण्यात येणाऱ्या विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आली आहे, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका विधानसभा निवडणुका झाल्यानंतर होणार असल्याने विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांमध्ये नाराजीचा सूर आहे.
मुंबई : केंद्र सरकारच्या 370 कलम हटवण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि पुतणे अजित पवार वेगळे वेगळे भूमिका मांडली आहे. अजित पवारांनी कलम 370 हटवण्यास समर्थन दर्शवत विरोधाला विरोध करायचा नाही, पण याबाबतीत राजकारण नको, असे आपल्या भाषणात म्हंटले आहे, दूसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या निर्णया विरोधात आहेत त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन मुख्य नेत्यांच्या भूमिकेत विरोधाभास दिसून येत आहे.
मुंबई : पुण्यासह मुंबईमध्ये गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रेल्वेने पुणे-मुंबई धावणाऱ्या डेक्कन क्वीन, इंटरसिटी, सिंहगड आणि इंद्रायणी एक्स्प्रेस या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या सुरळीत होण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील असा अंदाज मध्य रेल्वेनं व्यक्त केली आहे.
पुणे : आठवडाभर पासून पुण्यात सातत्याने होणाऱ्या पावसामुळे सोमवार, मंगळवार व बुधवारी जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सुट्टी जाहीर केली होती. त्यानंतर आता उद्या (8 आगस्ट ) देखील मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या चार तालुक्यातील शाळांना सुटी देण्यात आलेली आहे.
पुणे : राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) विधेयकाविरोधात आणि अन्य मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नेतृत्वात उद्या दिनांक 8 आगस्ट रोजी देशभरात संपाची घोषणा करण्यात आली आहे. आयएमएशी संलग्न पुण्यातील डॉक्टरांनी संपाला पाठिंबा जाहीर करून राज्यातील बहुतांश भागात असलेल्या पूर परिस्थितीमुळे संपात सहभागी होणार नाही, अशी भूमिका पुण्यातील डॉक्टरांनी घेतली आहे.
कोल्हापूर : दोन आठवड्यांपासून पडत असलेल्या मुसळधार पावासामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये भयावह पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले असून शेकडो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
सांगली : कृष्णा, वारणा नद्यांच्या महापुरामुळे सांगलीत दूध, पाणी, भाजी यासाठी लोकांना फारच कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी गर्दी पहायला मिळत आहे, जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अक्षरश: जलप्रलयाची स्थिती निर्माण झाली आहे.
कराड : पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे दरवाजे 14 फुटांवरून 16 फुटांवर नेण्यात आले आहेत. कोयना नदीत धरणातून प्रतिसेकंद 1 लाख 23 हजार 823 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, कोयनेसह कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून, महापुराच्या धोक्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंढरपूर : तालुक्यात भीमा नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूर रेषेतील 29 गावातील 7 हजार 513 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. उजनी आणि वीर धरणातील विसर्ग वाढल्याने भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पूर रेषेत येणाऱ्या तालुक्यातील 48 गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे.