खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन
📝वृत्तसंकलन : गुरुराज माशाळ
श्रीनगर : काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. श्रीनगरमधील मौलाना आझादनगर येथे भर दुपारी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील एकाची स्थिती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. बाजारामध्ये गर्दी असताना अचानक स्फोट झाल्याचे स्थानिक रहिवासी शेख जबैर यांनी सांगितले.
नवी दिल्ली : प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी करारामध्ये (आरसीईपी) सहभागी न होण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या करारावर भारत सरकार स्वाक्षरी करणार नसल्यामुळे शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरसीईपी करार हा जगातील सर्वात मोठा व्यापार करार आहे. या कराराबाबत भारताने चिंता व्यक्त करत हा करार न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नवी दिल्ली : राज्यातील सत्तास्थापन बाबत दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सोमवारी भेट घेतली. शिवसेनेकडून सत्तास्थापनेबाबत कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्न येत नाही, असं शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील राजपथाची पुनर्रचना करण्यासाठी वास्तूरचनाकार संस्था सेंट्रल व्हिस्टाने पंतप्रधान निवासस्थान ७ लोककल्याण मार्ग येथून स्थलांतरित करून राष्ट्रपती भवनाच्या दक्षिणेकडील डलहौसी रस्त्यावरील हटमेंट्समध्ये हलविण्याचा प्रस्ताव दिला आहे. याबाबत अजून कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. पंतप्रधान निवासस्थान आणि पंतप्रधान कार्यालय या दोन्हींचा स्थलांतर करताना विचार करावा लागणार आहे. त्यामुळे घाईगडबडीत हे काम केले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई : राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. तर अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, यासाठी शाहांची भेट घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. राष्ट्रीय आपत्ती निवारण (NDRF) निधीचे वाटप करण्याचे अधिकार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कडे असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन महाराष्ट्राला मदत करण्याची विनंती केली.
मुंबई : महायुतीत असूनही शिवसेनेच्या मागणीला किंमत मिळत नसेल, तर शिवसेनेने एनडीएमधून बाहेर पडून भाजपसोबतचे संबंध तोडून टाकावेत. त्यानंतरच खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या भूमिकेबाबत गांभीर्याने विचार होईल, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी म्हटले आहे. शिवसेनेने एकदा महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केल्यास राष्ट्रवादीकडूनही त्यांच्या सरकार स्थापनेच्या प्रस्तावावर विचार केला जाऊ शकेल, असेही परखड मत मलिक यांनी व्यक्त केले.
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता 11 दिवस उलटले तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नाही. या पार्शभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत आणि रामदास कदम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सोमवारी भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट होती. राज्यातील सत्तास्थापनेबाबत राज्यपालांनी पुढाकार घेऊन सत्तेचा गुंता सोडवावा, अशी मागणी केली असल्याची माहिती संजय राऊत यांनी भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
मुंबई : हेरगिरी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याप्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. भारतात व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे काम वेगवेगळ्या पातळीवर सुरु आहे. सरकार लोकांच्या खासगी जीवनावर अतिक्रमण करते की काय असे वाटत आहे. महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी त्वरीत एसआयटी स्थापन करुन श्वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
सोलापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे हे करमाळा मतदार संघातुन आमदारपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत आगमन झाले. यावेळी झेडपी कर्मचारी, अधिकारी व पदाधिकारी यांच्यावतीने
ढोल ताशांच्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करत 55 सफरचंदाच्या हार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी आपण मंत्रीपदासाठी नाही तर मतदार संघातील महत्वाच्या कामांसाठी भाजपला समर्थन दिल्याचे आमदार संजय शिंदे यांनी सांगितले.
सोलापूर : अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांची नुकसानीचे पंचनाम्याच्या कामांना गती देऊन 6 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गावनिहाय पंचनाम्यासाठी मंडल अधिकारी आणि तलाठ्यांची नियुक्ती केली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे आढावा घेण्यासाठी मुख्यसचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ काँफ्रेंसद्वारे संवाद साधला. जिल्हा निहाय किती नुकसान झाले आहे याची त्यांनी माहिती घेतली.
सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डेंग्यू सदृश्य आजाराने थैमान घातले आहे. या आजाराच्या रुग्णांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. गेल्या काही महिन्यात शहरासह ग्रामीण भागातील तब्बल 1 हजार 251 संशयित रुग्ण आढळून आले असून त्यांचे रक्त तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 80 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली होती. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने सोलापूर जिल्ह्यावर दाखलेल्या कृपेने जिल्ह्याची पावसाची सरासरी 90 टक्यांच्या आसपास झाल्याने जिल्ह्यातील टँकरची संख्या शून्यावर आली आहे. यंदाच्या दुष्काळात जिल्ह्यात तब्बल 398 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू होता. यावर जवळपास 40 कोटी रुपये इतका खर्च झालेला आहे.
अक्कलकोट : श्रीमंत राजकुमारी सुनीताराजे जयसिंहराजे भोसले यांचे पुणे येथे आकस्मित निघन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा अक्कलकोट येथील नवीन राजवाडा येथून दुपारी ४वाजता निघणार आहे. यामुळे अक्कलकोट शहरावर शोककळा पसरली आहे.
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे आढावा बैठक घेण्यात आले होते. तालुक्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची भरपाई तितक्याच प्रमाणत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. पंचनामा नीट झाले तरच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळणार आहे. तशात जर कोणी हलगर्जीपणा केला तर गय केला जाणार नाही. असा इशारा नूतन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यावेळी दिला.
पंढरपूर : कार्तिक एकादशी सोहळ्यादिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या करण्यात येणार असल्याचे पत्र विधी व न्याय विभागाकडून मंदिर समितीला मिळाला असल्याचे माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना चौथ्यांदा विठ्ठल रुक्मिणीच्या महापुजेचा मान मिळणार आहे.
हैदराबाद : तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यात असणाऱ्या अब्दुल्लापुरमेट तालुक्याच्या तहसिलदार विजया रेड्डी यांना त्यांच्या कार्यालयातच जिवंत जाळल्याची घटना आज घडली. एका व्यक्तीने तहसिलदार कार्यालयात घुसून विजया यांच्यावर पेट्रोल टाकत त्यांना पेटवून दिले, त्यानंतर स्वतःलाही त्याने पेटवून घेतले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र विजया यांचा जागीच मृत्यू झाला होता. विजया यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना तहसीलदार कार्यालयातील दोन कर्मचारीही जखमी झाले, त्यामधील एकाची प्रकृती गंभीर आहे.
उस्मानाबाद : गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात झालेल्या तब्बल 9 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राधाकृष्ण विखे पाटलांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीमध्ये विखेंच्या कारखान्याने शेतकऱ्यांचे 9 कोटी रुपये लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अमरावती : राज्यात १४ डिसेंबर २०१९ ते ३१ मार्च २०२० दरम्यान मुदत संपणाऱ्या ११३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक, १२३ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेले थेट सरपंचपदाची पोटनिवडणूक, तसेच ३१५२ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असणाऱ्या ५,०८४ सदस्यपदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने सोमवारी जाहीर केला. या सर्व ठिकाणी ८ डिसेंबर रोजी मतदान, तर ९ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. संबंधित सर्व ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात निवडणूक जाहीर झाल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.