मुंबई | राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सरकार स्थापनेसाठी तयारी करत आहेत. लवकरच हा प्रश्न सुटणार आणि राज्यात स्थिर सरकार येणार असे नेत्यांकडून सांगितले जात आहे.
शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत औपचारिक सहमती झाल्याचे वृत्त आहे. यामुळे महाराष्ट्रात सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या नव्या आघाडीला महाशिवआघाडीऐवजी महाविकासआघाडी असे नाव देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
महाशिवआघाडी यामध्ये शिवसेनेतील शिव हा शब्द घेतलेला आहे. मात्र दुसऱ्या कोणत्याही पक्षाचे नाव यामध्ये नाही. यामुळे दिल्लीत बुधवारी झालेल्या बैठकीत महाविकासआघाडी असे याचे नामकरण करण्यात आले असल्याची माहिती आहे.
धर्मनिरपेक्षाच्या मुद्द्यावरून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये सहमती झाल्याचे वृत्त आहे. दिल्लीतल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. शुक्रवारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्हीही पक्षांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेण्यात येईल.
या तिन्ही पक्षांकडून किमान समान कार्यक्रम राज्यात चालवता यावा यासाठी समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीमधील 2-2 सदस्य यामध्ये असतील. आता उद्या शिवसेनेच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक होणार आहे. या बैठकीनंतर सर्वकाही स्पष्ट होणार अशी माहिती आहे.