विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप महायुतीचे उमेदवार उमेदवार अंबादास दानवे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
दानवे यांनी तब्बल 524 मते घेत विक्रमी विजय मिळवला आहे. दानवे यांच्यासमोर काँग्रेस आघाडीने भवानीदास कुलकर्णी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. कुलकर्णी यांना अवघी 106 मते मिळाली. दानवे यांनी कुलकर्णी यांचा तब्बल 418 मतांनी पराभव केला आहे.अपक्ष उमेदवार शाहनवाज यांना अवघी 3 मते मिळाली.
या निवडणुकीमध्ये एकूण 647 मते पडली होती. यातील शिवसेना भाजपची हक्काची अशी 292 मते होती. 45 नगरसेवकांनी दानवे यांना आधीच समर्थन दिले होते. या सगळ्यांच्या एकूण मतांपेक्षा दानवे यांना 187 अधिकची मते मिळाली आहे. विजयानंतर अंबादास दानवे यांनी त्यांना मत देणाऱ्या सगळ्या मतदारांचे आभार मानले आहेत. त्यांना काँग्रेस किंवा MIM च्या नगरसेवकांनीही मतदान केले का ? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की “हे गुप्त मतदान असल्यामुळे हे अदृश्य हात कोण आहेत हे माहिती नाही, मात्र ज्यांनी मतदान केले त्यांचे मी आभार मानतो.”
संभाजीनगर संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विविध माध्यमातुन घोडेबाजार चालु असल्याच्या वावड्या उठत असतानाच मतदानाच्या अगोदर शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे व काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार भवानीदास कुलकर्णी यांनी संयुक्तपणे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे आम्ही दोघेही निवडणुकीत भ्रष्ट्र पध्दतीचा अवलंब करुन निवडणूक होऊ नये यासाठी प्रयत्नशिल असून आपापल्या पध्दतीने मतदारांशी संपर्क साधत असल्याचे कळविले होते. त्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने लोकशाही मार्गाने झाली असे म्हणावे लागेल.