एका पराभवाने आणि विजयाने कुणाची प्रतिष्ठा संपत नाही, कार्यकर्त्यांनो आणखी जोमाने कामाला लागू:सुप्रिया सुळे

ग्लोबल न्यूज नेटवर्क :  एका पराभवाने आणि विजयाने कुणाची प्रतिष्ठा संपत नाही. अमिताभ बच्चन यांचेही सिनेमे फ्लॉप होतात त्यामुळे खचून जावू नका असा सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे पराभूत उमेदवार आणि कार्यकर्त्यांना दिला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
लोकसभा निवडणुकीचा निकाल कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीसाठी धक्कादायक होता. केवळ ६ जागा  त्यांना मिळाल्या. धक्कादायक पराभवानंतर राष्ट्रवादीचे नेते माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत होते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या राज्यातल्या पराभवाबद्दल भाष्य केलं.
एका पराभवाने आणि विजयाने कुणाची प्रतिष्ठा संपत नाही. अमिताभ बच्चन यांचेही सिनेमे फ्लॉप होतात. पार्थ सहित सगळ्याच पराभूत उमेदवारांना सल्ला आहे की त्यांनी खचून जाऊ नये. आता आणखी जोरात काम करण्यासाठी तयारी केली पाहिजे. असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर, बारामतीत मिळालेला विजय हा कार्यकर्त्यांचा आहे. आणि नरेंद्र मोदींना मिळालेला विजय हा जनतेचा निर्णय आहे. तो मान्य केलाचं पाहिजे. आता त्यांनी उत्तम काम करावं असं मतही त्यांनी व्यक्त केलं.  याचबरोबर, आम्ही पुन्हा लोकांमध्ये जाऊ आणि त्यांचा विश्वास संपादन करू असंही त्यांनी म्हंटले.

admin: