एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा दोन्ही गटाकडून केला जात असला, तरी अद्याप त्याबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही. यादरम्यान दोन्ही गटांमध्ये पक्षप्रवेश सुरु असून आपल्या गटाची ताकद वाढवण्यासाठी शिंदे आणि ठाकरे मैदानात उतरले आहे. त्यातच आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद या शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. एका वुत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत सूचक विधान केले.शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर दीपाली सातत्याने ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत होत्या. पण पक्षात सुषमा अंधारे यांचा प्रवेश झाल्यापासून दीपाली सय्यद फारशा सक्रीय झालेल्या दिसत नाहीत. याचं नेमकं कारण विचारण्यात आलं असता त्यांनी ‘मी स्क्रीनवर येऊन तू-तू मै-मै करत नाही. जेव्हा गरज होती तेव्हा मी केली, असेही दीपाली म्हणाल्या.
सुषमाताई नुकत्याच आल्या असून त्यांना आपण शिवसेनेत आल्याचं आणि आपलं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. शिवसेनेत काम करताना मला आता साडे तीन वर्षं झाली आहेत. स्क्रीनवर येऊन टिप्पणी केली, कुरघोड्या केल्या तरच तुम्ही राजकारणात सक्रीय आहात असा समज करण्याची गरज नाही. सर्वसामान्य जनतेच्या समस्याही सोडविणे गरजेचे आहे.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघे एकत्र यावेत अशी माझी इच्छा होती आणि त्यासाठी मी वाट पाहत होती. कत्र आले तर आपलं बळ वाढेल असं मला वाटत होतं. कार्यकर्त्यांवर या गोष्टीचा फार परिणाम होत आहे, अशी चिंता दीपाली यांनी व्यक्त केली. प्रत्येकजण आपापली मतं मांडत आहेत. प्रत्येकाने आपला गट निर्माण केला आहे. लवकरच माझाही गट दिसेल, असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केलं.