सध्या कोल्हापूर, सांगली मध्ये जोरदार पूरस्थिती अजूनही कायम आहे. शिवसेना आणि कोल्हापूर हातकणंगले मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांनी सरकारी कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
२००५ पेक्षा आता बारा पट अधिक पाऊस पडला असून, संपूर्ण कोल्हापूर परिसर पाण्याखाली आहे. प्रशासनाच्या नियोजनात चूक आणि ढिसाळपणा आहे. असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर तोंडसुख घेतलं. कोल्हापूरमध्ये २० बोटी काम करत होत्या. किती तरी बोटी पंक्चर असल्याचं पाहायला मिळाल्याचं खासदार माने यांनी सांगितलं.
बोटींमध्ये बसण्यासाठी नागरिक घाबरत होते. शिरोळ तालुक्यात पुरात हजारो लोक अडकले असताना, तिथे फक्त २० बोटी पाठवण्यात आल्या. हा सरकारी कारभार अत्यंत ढिसाळ आहे. असं म्हणत त्यांनी सरकारी यंत्रणांचे वाभाडे काढले.
एखादा व्यक्ती जरी दगावला तरी त्याला पूर्णपणे प्रशासनच जवाबदार असेल, सध्या जिल्हाधिकारी कार्यालयच शिरोळ तालुक्यात हलवावं अशी भूमिका खासदार माने यांनी घेतली. आलमेट्टी धरणातून विसर्ग वाढवत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. दोन्ही राज्यांनी आपल्या सहमतीने विसर्ग ठरवावा, त्यांची बुडतील म्हणून जर ते माँचे बुडवत असतील तर अलमट्टीच्या धरणात माझ्या मतदार संघातून नक्षलवादी तयार झाल्यास त्याला सरकार जवाबदार असेल. असंही माने म्हणाले.
दरम्यान कोल्हापूर मधील पुरस्थितीचा धोका कमी झाला असून, सांगली मधील परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. “परिस्थिती अतिशय भयावह आहे. कोल्हापूर शहर व चिखली गाव जवळ जवळ असल्यामुळे त्यांच्यावर माध्यमांचे लक्ष आहे. पण ग्रामीण भागात अजुनही अशी गावे आहेत, जिथे महिला आपल्या मुलाबाळांसह छतावर येऊन बसलेल्या आहेत. पण त्यांच्या हाकेला प्रतिसाद मिळत नाहीये” अशी प्रतिक्रिया खासदार धैर्यशील माने यांनी दिली आहे. बीबीसी मराठी या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधी सोबत ते बोलत होते.
एकाचवेळी तब्बल दहा हजार कुटुंबे पाण्याच्या विळख्यात असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी यावेळी दिली. अलमट्टी धरणातुन पुरेसा विसर्ग सुरु नसल्याने या परिसरात नागरिकांना अक्षरशः मृत्युकळा सोसाव्या लागत आहेत. मागील वेळेपेक्षा कित्येक पटीने गंभीर असे हे संकट असुन सरकारी नियोजन पुर्णपणे चुकले आहे. कित्येक बोटी पोचतच नाहीयेत आणि अनेक बोटी तर पंक्चर आहेत. त्यांच्या दुरुस्तीची साधी यंत्रणाही इथे उपलब्ध नसल्याचं सांगत या हलगर्जीपणाला माझ्यासहीत सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासन जबाबदार आहे अशी कबुली त्यानी दिली.