आमदार रोहित पवारांची ती भावनिक पोस्ट ठरतेय कौतुकास्पद

मुंबई । गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार हे सातत्याने चर्चेत असतात. राज्यात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला सत्ता स्थापनेचा घोळ एकदाचा मिटला असून या निमित्ताने अनेक बहुतांश सर्वच आमदार हे मुंबईत होते. दोन दिवसाचे अधिवेशन संपवून आमदार रोहित व आमदार विश्वजीत कदम हे एकाच गाडीतून गावी निघालेले असताना वाटेत दोघांनी आपल्या मुलांसाठी खेळणी खरेदी केली.

त्याची फेसबुक पोस्ट रोहित पवार यांनी टाकली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून घडणाऱ्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचं आपण पाहिलं आहे. त्यामुळे सर्वच राजकीय नेते राजकीय वर्तुळात व्यस्त दिसले. राज्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे दिवसभर बैठका आणि सभांमध्ये नेत्यांना उपस्थित राहावं लागलं. यामुळे त्यांचं कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. या सगळ्याचा आढावा घेत आमदार रोहित पवार यांनी एक भावनिक फेसबुक पोस्ट केली आहे

अशी आहे ही पोस्ट

गेले दहा बारा दिवस राज्यात अनेक घडामोडी घडत होत्या. अनेक राजकीय पेचप्रसंग तयार झाले पण शेवटी राज्यातील जनतेच्या इच्छेनुसार आपल्यालाच यश मिळालं.  परवादिवशी बहुमताने आपल्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाले, काल अधिवेशन देखील पार पडले. विधानसभेचा सदस्य या नात्याने मी असेन किंवा वेगवेगळ्या पक्षांचे आमदार आम्ही सर्वजण या घडामोडींचा भाग होतो. आम्हा युवा आमदारांना खूप मोठा अनुभव देणारा हा काळ होता.

कालच्या अधिवेशनाचे कामकाज संपवून याच घडामोडींवर चर्चा करत मी आणि आमदार डॉ.विश्वजित कदम गाडीने एकत्र निघालो होतो, साहजिकच गप्पा राजकीय रंगल्या होत्या पण अचानक रस्त्याच्या बाजूला एक खेळण्याचं दुकान दिसल्याबरोबर दोघांनाही त्या ठिकाणी जाण्याचा मोह आवरला नाही. कारण मुंबईत या सर्व गोष्टी घडत आहेत, आमदार म्हणून यात भाग घेऊन आम्ही आमचं कर्तव्य पार पाडत आहोत पण याकाळात आपल्या घराची विशेषतः आपल्या मुलांची आठवण देखील येत असते. राजकारणात काम करणे म्हणजे एका मोठ्या कुटुंबात वावरल्याचा अनुभव असतो, आपला मतदारसंघच आपलं कुटुंब बनत आणि त्यांच्यासाठी आम्ही आनंदाने काम देखील करत असतो परंतु कधी कधी या जबाबदारीत घराकडे थोडं दुर्लक्ष होत, एक बाप म्हणून जेवढा वेळ आपल्या मुलांना दिला पाहिजे तेवढा  देऊ शकत नाही  त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकानेच अशा छोट्या छोट्या प्रसंगातून नेहमीच आनंद शोधायचा प्रयत्न केला पाहिजे.

आता घरी पोहचल्यानंतर मला भेटल्यानंतर आणि त्यांच्यासाठी घेतलेली खेळणी हातात बघून माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल तो माझ्यासाठी खूप समाधानकारक असेल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: