आपण जे बोलतो ते करतो का, फडनवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

आपण जे बोलतो ते करतो का, फडनवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

ग्लोबल न्युज: सध्या राज्यात कोरोनाच्या वाढत्या संकटात महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये चांगलेच शब्दीक युद्ध रंगलेले दिसून येत आहे. याच प्रश्वभूमीवर पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंना टोला हाणला आहे.

आपण ज्या घोषणा करतो, त्याप्रमाणे ते करतो का, याचा महाराष्ट्र सरकारकडून विचार होणे आवश्यक आहे. ८० टक्के खाटा अधिग्रहित करण्यात येणार असल्याचे केवळ सांगण्यात आले, पण रूग्णांना खाटा मिळत नाही, ही वास्तविकता आहे. राज्य सरकारची ‘पुनश्च हरिओम’ ही संकल्पना चांगली आणि ती आवश्यकच आहे. सुरूवातीला काही अडचणी येतील. पण, खुल्या दिलाने ‘पुनश्च हरिओम’ पुढे न्यावे लागेल. अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यातील अडचणी आणि न घेण्यातील धोके यातून सुयोग्य मार्ग काढावा लागेल. भविष्याचा विचार करून निर्णय घ्यावे लागतील. म्हणजे योग्य निर्णय होईल. सध्या तरी राज्यात आजची अवस्था ही ‘केवळ पॉलिसी पॅरालिसिस’ नाही, तर ‘अक्शन पॅरालिसिस’ची सुद्धा आहे, असे फडणवीसांनी बोलून दाखविले होते.

पुढे नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कारकिर्दीला १ वर्ष पूर्ण झाले आहे. या काळात कलम ३७०, राममंदिर, भारतीय नागरिकत्त्व कायदा, ट्रिपल तलाक यासारखे ऐतिहासिक निर्णय झाले. आयुष्मान भारत, गरिब कल्याण योजना, बँकांचे विलिनीकरण यासह अनेक योजनांमध्ये भरघोस प्रगती साधण्यात आली. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात सुद्धा मोठी मदत मिळाली. देशात ३८४० रेल्वेगाड्या श्रमिकांसाठी सोडण्यात आल्या. पाच हजारावर महाराष्ट्रातील एमएसएमईंना ८०० कोटीहून अधिक रकमेचे कर्ज या अभियानांतर्गत मंजूर करण्यात आले आहे.

आरोग्य सेतू अपच्या माध्यमातून सुरक्षेचे कवच उपलब्ध करून देण्यात आले. १२० देशांना भारत आज औषधी पुरवितोय्. पीपीई किट आणि एन ९५ मास्कची निर्मिती आता भारतात होतेय. देशभरात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची उभारणी करण्यात आली.

महाराष्ट्रात सुद्धा आता ३५ हजार चाचण्यांची दैनंदिन क्षमता तयार झाली आहे. असे असले तरी मुंबईत १ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण चाचण्यांपैकी ५६ टक्के चाचण्या मुंबईत होत्या. ३१ मे रोजी ते प्रमाण २७ टक्क्यांवर आले. म्हणजे चाचण्या झाल्या पण, मुंबईबाहेर. मुंबईत सर्वाधिक रूग्ण आढळत असताना मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवायला हवी, असे ते यावेळी म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: