सत्ताकाळात आमच्या मागण्यांकडे कायमच दुर्लक्षच करण्यात आले.
सातारा | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महा जनादेश यात्रेचे सातारा येथे दुपारी आगमन झाले. यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यासभेमध्ये उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करतांना सर्वप्रथम शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना तलवार भेट दिली तर उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना पारंपारिक राजेशाही पगडी घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी उदयनराजेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप लावले आहेत. सत्ताकाळात आमच्या मागण्यांकडे कायमच दुर्लक्षच करण्यात आले. आमच्या सर्व फायली या डायरेक्ट डस्टबीनमध्ये जायच्या असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस राष्ट्रवादीची अवस्था अशी का झाली याविषयी त्यांनी आत्मचिंतन करायला हवे असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीने मला सहनशीलतेचा पुरस्कार द्यायला हवा होता
उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. 15 वर्षे मी त्यांच्यासोबत होतो. मात्र विचार केल्यानंतर कळाले की, एक तरी लोकांच्या हिताचं काम काँग्रेस एनसीपीच्या सरकार असताना झालं का? आम्ही मागण्या घेऊन गेलो तर आमच्या नावासमोर फुलीच होती. आमची फाइल जायची ती डायरेक्ट डस्टबीनमध्ये जायची. असे अनेक वर्षं गेले. वास्तविकरित्या त्यांनी काम नाही केलं. तर निदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला काही नाही तर एक सहनशीलतेचा पुरस्कार तरी द्यायला हवा होता. मात्र तेही माझ्या नशीबी नव्हतं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
भाजप सरकार आल्यापासून साताऱ्यासाठी 15 कोटींची कामं झाली आहेत
उदयनराजे बोलताना म्हणाले की, मी कामं करायचा प्रयत्न केला. मात्र कामाच्या बाबतीत मी जेव्हा जायचो तेव्हा माझ्या पदरी निराशाच पडली. जी कामं झाली ती रेटून केली म्हणून झाली. सत्तेत असताना एक रुपयाचं काम झालं. नाही. अक्षरशः भांडावा लागतं. रेटारेटी होत होती. ही लोकशाहीची पद्धत नाही. मात्र तेव्हा माझ्याकडे पर्याय नव्हता. मात्र भाजप सरकार आल्यापासून अनेक कामं झाली. जवळपास 15 हजार कोटीचे कामं झाली आहेत.
ईव्हीएमच्या मुद्द्यावर उदयनराजेंचे घुमजाव
ईव्हीएमच्या मुद्द्यावर उदयनराजेंनी घुमजाव केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये असताना उदयनराजेंनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजप शिवसेना सरकावर प्रश्न उपस्थित केले होते. आता त्यांनी यावरही भाष्य केले आहे. ईव्हीएमवर मलाही संशय होता. एवढं मतदान या पक्षाला का मिळतं असा प्रश्न मलाही पडला होता. नंतर मी विचार की, देवेंद्रजींनी आतापर्यंत अनेक कामं केली आहेत. सर्व कामे मार्गी लावली. यामुळेच लोक त्यांचे काम पाहून मतदान करतात. लोकं नाव ठेऊ दे की, काहीही करो. मला ठाम विश्वास आहे की, ही सर्व सर्व कामाला लावणारी लोक नाही. तर कामं मार्गी लावणारी लोक आहेत.
पूर्वीच्या सरकारने फक्त आडवा आणि जिरवा धोरण अवलंबले
उदयनराजे भोसले म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रवादीच्या फक्त आश्वासनांमुळे आणि नाकर्तेपणामुळे आज दोन्ही जेष्ठ पक्षाची अवस्था म्हणजे तुकड्यांसारखीच झाली आहे. मी कोणाला कमी लेखतो अशातला भाग नाही. पण खरोखर त्या त्या पक्षातील लोकांनी आपल्या पक्षाची अशी अवस्था का झाली याचे आत्मचिंतन केलं पाहिजे. आत्मपरिक्षण केलं असतं तर आज आत्मक्लेश करायची वेळ आली नसती. एकदा दोनदा लोक समजून घेतात. पण स्वातंत्र्य मिळाल्यापासून तुम्ही जी योजना राबवली. ती म्हणजे आडवा आणि जिरवा. त्याला आवडा आणि त्याची जीरवा. आता या योजनेला कंटाळून लोक आणि उमेदवार जात आहेत.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.