नवी दिल्ली | विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून दहा दिवस उलटले आहे. भाजप शिवसेनेच्या युतीला जनतेने कौल दिला आहे. मात्र अद्यापही सरकार स्थापन झालेले नाही. शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून बसलेली आहे. तर भाजप पद सोडायला तयार नाही.
दरम्यान राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत. ते सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावयाचा काय? या मुद्याभोवती ही चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे.
शरद पवार रविवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले आहेत. यापूर्वी त्यांनी फोनवरुन सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. सोनिया गांधी यांनी या संदर्भात पक्षातील नेत्यांच्या मतापेक्षा शरद पवार यांच्या मताला अधिक महत्त्व किंवा विश्वासार्ह मानत असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेत शिवसेना सत्ता स्तापन करणार का? की चार पाऊल मागे जाऊन भाजपचा हात धरणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री आज दिल्लीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत आहेत. राज्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक मदतीची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी दिल्लीत जात आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून अधिक आणि तातडीची मदत मिळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेणार आहेत.. राज्यातील सत्तास्थापनेच्या संदर्भात देखील ते शहा यांच्याशी चर्चा करतील.