अखेर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली, विखे आणि मोहिते पटलांबरोबर आशिष शेलार यांच्या नावांची चर्चा

ग्लोबल न्यूज नेटवर्क: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त सापडल्याचं बोललं जात आहे. सर्वात आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र ते नेमकं कधी होणार, याविषयी त्यांनी काहीही सांगितलं होतं. त्यानंतर स्वत: अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी सकाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होणार हे जाहीर केलं.

पावसाळी अधिवेशन सोमवार १७ जूनपासून सुरू होणार आहे. त्यामुळे १४ जूनलाच मंत्रीमंडळ विस्ताराची घोषणा होऊ शकते, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रणजीतसिंह पाटलांच्या समवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे या चर्चेला अधिकच बळ मिळालं आहे.

कोण-कोण गेलं ‘वर्षा’वर?

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मोर्चेबांधणी सुरू केली असून सध्याच्या राज्य सरकारच्या कार्यकाळातल्या शेवटच्या अधिवेशनात सरकार पूर्ण तयारीनिशी उतरण्याच्या विचारात आहे. याच पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रीमंडळ विस्तार करण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला आहे. आता यामध्ये कुणाची वर्णी लागणार आणि कुणाचं खातं जाणार? याविषयी तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील, रणजितसिंह पाटील, गिरीष महाजन हे देखील उपस्थित होते. तसेच, काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार, बंडखोर काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे मंत्रिमंडळातल्या संभावित नावांबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

धिरज करळे: